शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक आहे. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. हे विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाकप, माकप, भाकप माले, शेकाप, सकप, लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष – संघटनांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.22) जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. या जनसुरक्षा विधेयकाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.
ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते प्रसाद भोईर, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, भारत जोडो अभियानच्या उल्का महाजन यांसह विविध जनसंघटना व कामगार संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हा मोर्चा शेतकरी भवन येथून निघणार आहे. त्यानंतर एसटी स्थानक, महावीर चौक, बालाजी नाका, मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.