पुन्हा मास्क, पुन्हा निर्बंध?

कोरोनाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा
। मुंबई । वार्ताहर ।
कोरोना संपला, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच आता पुन्हा एकदा हा विषाणू उफाळून आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यासह केंद्रातही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे.

हा टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारला सूचना करणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा निर्बंध लागणार, पुन्हा मास्क लावावा लागणार का, असा प्रश्न जनतेसमोर आहे.

तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. केंद्र सरकारक़डून सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. तसंच बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज केंद्रीय स्तरावर याबाबत बैठकही होणार आहे. त्यानंतर निर्बंधांबद्दल महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.

Exit mobile version