माथेरानला ई वाहनांची चाचणी होणार

| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान सनियंत्रण समितीने परवानगी दिल्यानंतर सर्वोच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार कडून ई रिक्षाची चाचणी घेईल असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पालिकेला पत्र पाठवून ई रिक्षाची चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ई वाहनाची चाचणी घेण्यात येणार असल्याने माथेरानकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. माथेरान सनियंत्रण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा झाली. त्यावेळी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष के पी बक्षी आणि सदस्य सचिव रायगड चे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी माथेरान नगरपालिकेस ट्रायल्स साठी ई टेंडरिंगच्या माध्यमातून तीन ई रिक्षा खरेदीसाठी मान्यता दिली होती. त्या बैठकीत पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी माथेरान पालिकेकडून राज्य सरकारच्या नगरविकास विभागला पत्र पाठवून ई रिक्षाच्या चाचण्या घेण्याची मान्यता मागितली होती. त्यानुसार मंत्रालयातील नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी रश्मीकांत इंगोले यांनी आदेश जारी करताना सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निवेदनाप्रमाणे ई रिक्षा यांची चाचणी घेवून तीन महिन्यानंतर अहवाल आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी माथेरान मध्ये ई रिक्षा यांची चाचणी घेण्यासाठी आता पालिका कधी ई वाहन खरेदी करणार आणि ती वाहने कधी माथेरान मध्ये येणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. माथेरान मध्ये ई रिक्षा आल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी यांची पायपीट वाचणार आहे. त्यामुळे ई रिक्षाची माथेरानकर मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Exit mobile version