आनंदाची उधळण करणारा ख्रिसमस

अमृता वाडीकर

ख्रिसमस म्हणजेच नाताळ… प्रभू येशूच्या जन्माचा हा उत्सव. आज ख्रिसमस जगातल्या जवळपास प्रत्येक देशात उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. प्रभू येशूने मानवतेचा संदेश दिला. अखिल मानवजातीच्या उत्थानासाठी ते झटले. नाताळच्या निमित्ताने शांतता, प्रेम, बंधुता ही प्रभू येशूने दिलेली शिकवण अंगिकारण्याची आवश्यकता आहे. एकीकडे ख्रिसमस, नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सद्यपरिस्थितीत सामाजिक भान हरवणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे. 

सण, उत्सव माणसाच्या आयुष्यात नवे रंग भरतात. माणसाच्या नित्याच्या जगण्याला नवा अर्थ देतात. सणाच्या निमित्ताने माणसं एकत्र येतात. विचारांची देवाणघेवाण होते. संस्कृतीचं आदानप्रदान होतं. ख्रिसमस हा सुद्धा असाच बहुआयामी सण. 25 डिसेंबर हा प्रभू येशूचा जन्मदिवस. या महात्म्याच्या जन्माचा उत्सव जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगदी युरोप-अमेरिकेपासून भारत आणि चीनमध्येही ख्रिसमसचा जल्लोष पहायला मिळतो. ख्रिसमस आणि त्यानंतर येणारं नवं वर्ष साजरं करण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. ख्रिसमसनिमित्ताने बाजारपेठा सजू लागतात. विविध आकारांचे ख्रिसमस ट्री, सजावटीच्या वस्तू, सांताक्लॉज, लाल रंगाच्या टोप्या यांची रंगत न्यारीच असते. केक, कुकीजचा घमघमाट सुटलेला असतो. सगळं वातावरण कसं उत्साहाने आणि चैतन्याने भारलेलं असतं. ख्रिसमस हा ख्रिस्ती धर्मीयांचा सण असला तरी अन्य धर्मीयही या सणाचा आनंद लुटताना दिसतात. लहानग्यांना सांताक्लॉजचं आकर्षण असतं. हा सांताक्लॉज पोतडीतला आनंद जगभर वाटत सुटतो. ख्रिसमस ट्रीचा लखलखाट जीवनातला अंध:कार दूर करतो. ख्रिसमसची चांदणी आशादायी चित्र निर्माण करते. आजमितीला नाताळ हा सण आधुनिक जागतिक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनून गेला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सणाच्या निमित्ताने आपसूक येणार्‍या उत्साह, जल्लोष आणि धांगडधिंग्यासह सणाचा मूळ अर्थ किंवा गाभा समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक सण एक संदेश घेऊन येत असतो आणि हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणंही गरजेचं असतं.
प्रभू येशूने जगाच्या उद्धारासाठी जन्म घेतला. त्याने गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं. प्रसंगी अंगावरच्या असह्य जखमाही सहन केल्या. येशूने लोककल्याणाचं व्रत अंगिकारलं होतं. येशू कधीही आपल्या उद्दिष्टांपासून ढळला नाही. प्रभू येशूने शांततेची, सहनशीलतेची शिकवण दिली. त्याने दयेला आणि क्षमेला अत्युच्च महत्त्व दिलं. आज माणसामाणसांमधली तेढ वाढत असताना प्रभू येशूंच्या शिकवणुकीतून धडा घेत मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. संयमी, सहनशील वृत्ती अंगी बाणवणं आवश्यक आहे. सणाच्या निमित्ताने एकत्र येणं आवश्यक आहे आणि प्रेमाचा प्रकाश पसरवणं आवश्यक आहे.  येशू ख्रिस्ताची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजे आजचं मध्यपूर्वेतलं पॅलेस्टाईन. पण आजच्या सर्वधर्मसमभाव असणार्‍या ग्लोबल युगात देश-धर्म यांच्या मर्यादा न मानता आपण सर्वांसमवेत आनंदाचे क्षण टिपण्यासाठी उत्सूक असतो. एक परीने छानच आहे. पण हे साजीरे-गोजीरे क्षण वेचताना आपण त्यातले अन्यवार्थ लावून पहायला हवेत. येशूच्या आधी दोन हजार वर्षांपूर्वीपासून त्या प्रदेशाला ‘दुधा-मधाचा प्रदेश’ असं म्हटलं जात असे. शांतताप्रिय, हुन्नरी लोकांचा हा प्रदेश. ऐसपैस कपडे, कानड्याच्या वस्तू तयार करणं असे उद्योगधंदे तिथले लोक करत. त्या काळी त्या वस्तूंना आजूबाजूच्या प्रदेशातून प्रचंड मागणी होती. त्यामुळे हा देश जणू सुवर्णभूमीच होता. पण जगाच्या नकाशात ‘मोक्याची जागा’ ठरल्यामुळे इथली सुख-शांती फार काळ टिकली नाही. परचक्र, अन्याय, अत्याचार सततचं शोषण-सत्र याला तिथली जनता तोंड देत राहिली. नरबळी, पशुबळीच्या प्रथा फोफावल्या आणि मग हतबल अशी तिथली जनता ‘प्रेषितां’ची वाट पाहत राहली. अशा अवघड परिस्थितीत त्यांचा तारक ‘येशू’ आला. त्याने आश्‍वासन दिलं की ‘मी नवा धर्म सांगायला आलो नाही तर ‘जुना करार’ पूर्ण करण्यासाठी आलो आहे. माझी शिकवण आणि अवतारकार्य जगाच्या कल्याणासाठी आहे, असं ख्रिस्ताने संदेशामध्ये म्हटलं आहे. सर्वांना परिपूर्ण आणि संपन्न जीवन प्राप्त करुन देणं हे माझ्या कार्याचं प्रयोजन आहे. लोकांनी माझी सेवा करु नये. मी लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे असं त्याने म्हटलं आहे. नंतर येशूने निक्षून स्पष्ट केलं आहे की, माझं जीवन सेवेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हीदेखील लोकांची सेवा करायला हवी. ईश्‍वराने जे गुण, संपदा, अधिकार, सत्ता आणि हक्क आपल्याला दिले ते सारे आपण स्वार्थी वृत्तीने, अप्पलपोटेपणाने केवळ स्वत:च्या भल्यासाठी वापरु नयेत. आपल्या संपत्तीमध्ये, गुणांमध्ये, अधिकारात आणि सत्तेमध्ये इतरांना सहभागी करुन घ्यायला हवं. दुसर्‍यांनाही त्या सर्व गोष्टींचा फायदा करुन द्यायला हवा. याच भूमिकेतून येशू ख्रिस्ताने गरिबांमध्ये ईश्‍वरी अंश शोधण्याची शिकवण दिली आहे. गरीब गरजवंतांमध्ये आपण परमात्म्याचं दर्शन घ्यायला हवं. त्याचप्रमाणे संकटात, अडचणीत, विपन्नावस्थेत, रुग्णावस्थेत असणार्‍यांची काळजी घेऊन मदत करायला हवी, असं येशू सांगतो. येशूने गरिबांसाठीचं कार्य एवढं महत्त्वाचं मानलं की तो म्हणतो, गरिबांचा सन्मान हा माझा सन्मान आहे. गरिबांना मदत ही मला मदत आहे. गरिबांची सेवा ही माझी सेवा आहे. येशूच्या व्याख्येनुसार अडचणीमध्ये, असहाय्य असणारे सारे गरिबावस्थेत असतात. त्यामुळे जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी आपण सर्वांच्या भल्यासाठी जगणं आवश्यक आहे. केवळ बोलून, विधानं करुन शांती निर्माण होणार नाही. त्यासाठी भरीव कार्य झालं पाहिजे. येशू ख्रिस्ताचा हा संदेश आजच्या विदारक परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा ठरतो.  
आज संपूर्ण जगाला प्रभू येशूसारख्या महात्म्याच्या शिकवणीची आवश्यकता आहे. मागील दोन वर्षं संपूर्ण जग कोरोनाच्या छायेखाली वावरत आहे. कोरोनाकाळात अनेकांनी आपले आप्त गमावले. आपण सर्वांनीच अत्यंत भयावह परिस्थिती अनुभवली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, संसार उघड्यावर पडले. खायची भ्रांत पडली. यामुळे गरीब अधिकच गरीब झाला. दारिद्ररेषेखालील लोकांची संख्या वाढली.  नैराश्याचं प्रमाण वाढलं. माणसं हतबल होऊ लागली. आताही ओमिक्रॉनचा धोका वाढतो आहे. मात्र  हा वाईट काळ सरणार आहे. आशेची सोनेरी पहाट पुन्हा उगवणार आहे, असा सकारात्मक विचार घेऊनच ख्रिसमसचा हा सण आला आहे आणि हाच विचार मनात ठेऊन तो साजराही केला पाहिजे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच सामाजिक भान जपतच नाताळ आणि नववर्षाचं स्वागत करायला हवं.
बदलत्या काळानुसार नाताळचं स्वरुपही बदलत गेलं. आज जग जवळ आलं आहे. जागतिकीकरणाच्या या काळात  नाताळचा सणही धर्माच्या भिंती ओलांडून सर्वदूर पोहोचला आहे. पूर्वी ख्रिस्तीधर्मीय हा सण केवळ आपल्या वर्तुळात साजरा करत असत. भेटींची देवाणघेवाण, परस्परांच्या घरी भेटी देऊन नाताळच्या शुभेच्छा देणं, गोडधोड खाऊन सण साजरा करणं हे उपचार स्वधर्मीयांमध्येच साजरे होत असत. त्यात अन्य धर्मीयांना सामावून घेण्याचा विचार अभावानेच दिसायचा. आता मात्र हा संकुचित विचार मागे पडून नाताळसारख्या सणात सर्व धर्मीयांचा सहभाग होताना दिसत आहे. ख्रिस्तीधर्मीय अन्य धर्मीयांना या सणात सहभागी करुन घेताना दिसत आहेत. येशूची हीच खरी शिकवण आहे जी अंगिकारली जाणं हा अत्यंत सुयोग्य बदल ठरतोय. कारण येशू कोणत्याही एका धर्माचा नाही, कोणत्याही एका भूभागाचा नाही. त्यावर कोणा एकाची मालकी नाही. तो अवघ्या विश्‍वाचा आहे. त्याचं जीवनचरित्र, शिकवण अवघ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे कोणा एका समाजाने नाताळ साजरा करावा असं नाही. येशू सर्वांचा आहे म्हणूनच नाताळही सर्वांचा आहे. धर्म कोणताही असला तरी त्यातील संतांनी, महात्म्यांनी मानवता, भूतदया, संवेदनशीलता, सचोटी यांचेच धडे दिले आहेत.  सध्याच्या हिंसाचाराने कलुशित झालेल्या वातावरणात संतांच्या अशा शिकवणीची उजळणी होणं आणि चिंतन आणि मनन होऊन आचरणात आणणं गरजेचं आहे.
येशूने आपल्या जीवितकार्यामध्ये संदेशाबरोबरच कार्यबाहुल्य जपलं. आपल्याला अपार कष्ट देणार्यांनाही त्याने मोठ्या मनाने माफ केलं. देवाच्या चरणीदेखील त्यांना माफ करण्याची विनंती केली. हीच क्षमाशीलता आजच्या काळात जपणं आवश्यक आहे. आज अगदी शुल्लक गोष्टींवरून वाद उकरून काढले जात असताना संत, महात्म्यांनी दिलेला क्षमाशीलतेचा संदेशच आपल्याला तारून नेऊ शकतो. एका साध्या कुटुंबात जन्मलेला येशू आपल्या उच्च विचार, कठोर परिश्रम, उन्नत आचरण आणि संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराचा वसा घेतल्याने सर्वोच्चपदी पोहोचला. अशा महात्म्याचा जन्मदिवस उत्साहाने, आनंदाने, मोठ्या समारोहाने साजरा करण्यात चूक काहीच नाही. मात्र केवळ यातच रंगून जाणं आणि त्याच्या शिकवणीकडे कानाडोळा करणं हे आपल्याला शोभणारं नाही. मोठी खरेदी, सजावट, मेजवानी यांचा आनंद लुटत असताना या थोर महात्म्याची शिकवणही विचारात घ्यायला हवी. असं झालं तरच ख्रिसमस खर्‍या अर्थाने साजरा होऊ शकेल. 

Exit mobile version