विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न; उदय कळस यांचा प्रथम क्रमांक
| म्हसळा | वार्ताहर |
केंद्र सरकारचा स्वच्छ सर्वेक्षण 2022 या उपक्रमात म्हसळा नगरपंचायतीने भाग घेऊन संपूर्ण राज्यात 32 वा क्रमांक पटकाविला आहे. नगरपंचातीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष असल कादिरी, उपनगराध्यक्ष संतोष शेडगे, सर्व नगरसेवक आणि म्हसळा नगरपंचातीचे संपूर्ण प्रशासन यांनी शहरात नावीन्यपूर्ण संकल्पना राबऊन शहर जास्तीत जास्त स्वच्छ आणि सुंदर राखण्याचा प्रयत्न केला.
शासनाच्या निर्देशनुसार स्वच्छता, पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे संदेश प्रसारित करणारी भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावून पर्यावरण आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यात आला. त्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी व खुल्या वर्गासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सेफ्टी पॉईंट अशा प्रकारच्या विविध स्पर्धा घेऊन जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे गौरी गणपती सणाचे औचित्य साधून पर्यावरणपूरक देखावे करण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले.
यामध्ये शहरातील पत्रकार उदय कळस, समीर दिवेकर, जागृती दिवेकर, सुशील दिवेकर या मंडळींनी बांबू आणि नारळाच्या झावळ्यांचा वापर करून पूर्णपणे पर्यावरणपूरक अतिशय सुंदर असा देखावा सादर केला. या देखाव्यास नगरपंचायत प्रशासनाने पाहणी करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले. त्याचप्रमाणे स्वराज संतोष उद्धकर (चित्रकला-प्रथम), मयूर महेंद्र ढवळे (प्रथम-सेल्फी), मेहजवस कासीम हमदानी (प्रथम-वेशभूषा), आराध्य शशिकांत शिर्के आणि इतर अनेक स्पर्धांचे बक्षीस समारंभ घेण्यात आले.
या बक्षीस समारंभास नगराध्यक्ष असल कादिरी, उपनगराध्यक्ष संतोष शेडगे, नगरसेविका राखी करंबे, नगरसेवक जंजिरकर, नगरसेवक नसीर मिठागरे, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे, नगरसेविका सुमैया कासीम अमदानी, सुशील यादव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सर्व यशस्वी स्पर्धाकाना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले कि अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाचा हा अतिशय विधायक उपक्रम होता. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच आमचे सहकारी यांनी या उपक्रमात उत्तम सहकार्य केल्यामुळे राज्यात 102 क्रमांकावर असणार्या म्हसळा नगरपंचातीला 32 व्या क्रमांकावर येता आले, आणि भविष्यात एक आकडी क्रमांकासाठी आमची पुढील वाटचाल असेल असे आश्वासनही मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी दिले. त्यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी यांनी यापुढेही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.