| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महादेवखार आणि महाळुंगेमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. महिन्या भरापासून एमआयडीकडून पाणी पुरवठा करण्यास टाळाटाळ झाली आहे. त्याचा परिणाम येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कार्यालयात जाऊन निवेदन दिले आहे. पाणी मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव महाळुंगे या गावांतील विहीरीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. विंधन विहीरीद्वारेदेखील मुबलक पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे या गावांतील नागरिकांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बिरला कंपनीमार्फत दर आठवड्याला अथवा पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पाण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. गावांना पाणी पुरवठा मुबलक मिळावा, म्हणून 26 गाव योजना राबविण्यात आली. तरीदेखील गावांना पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 26 गाव योजनेमध्ये महादेवखार हे गाव शेवटचे आहे. मात्र अजूनपर्यंत या गावाला पाणी नाही. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थांनी 7 मे रोजी संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाण्याच्या समस्येचे गाऱ्हाणे मांडले.
मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी बिरला कंपनीवर ढकलून आपल्याकडील जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. खारगांवपर्यंत पाणी पुरवठा होतो. नवीन कनेक्शनसाठी बिरला कंपनीकडून पाण्याची लाईन तोडण्यात आली आहे. त्यामुळे हा पाणी महादेव खारपर्यंत पोहचत नसल्याचे सांगण्यात आले. पाण्याची लाईन जोडण्यात आली आहे.याबाबत चौकशी करून लाईन चालू करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, एक महिना होत आला तरीदेखील पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. मात्र, एमआयडीसीसह अन्य विभागातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
