चौकशी करण्याची मागणी
। उरण । वार्ताहर ।
भूमीअभिलेख कार्यालय उरणच्या कर्मचार्यांचा मनमानी कारभार व अरेरावीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्मचार्यांनी मनमानी कारभार व अरेरावी बंद करावी, नागरिकांची कामे सुरळीत व्हावी व त्यांना वेळेवर कागदपत्रांची पूर्तता व्हावी अन्यथा त्याविरोधात सर्वसामान्य जनतेच्यावतीने सामाजिक संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
भूमीअभिलेख कार्यालय उरण येथे अनेक दिवसापासून कर्मचार्यांच्या गलथानपणा, मनमानी कारभार, अरेरावीपणा व वेळेवर कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साधारण, तात्काळ व अति तात्काळ मोजणी करायची असल्यास सहा महिने किंवा वर्षभरानंतर मोजणी होते. क-प्रत आठ दिवसांत मिळण्याऐवजी महिना दिली जात नाही. वारसांना व खरेदी-विक्रीचे फेरफार वेळेत होत नाही. जमीनचे वर्ग बदल करण्यासाठी एक-एक महिना कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या कार्यालयातील भोंगळ कारभाराची चौकशी करून नागरिकांना होत असलेल्या त्रासापासून मुक्तता द्यावी, अशी मागणी सामाजिक संघटननांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास कार्यालयासमोर आंदोलन करेल अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देऊन याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.







