। चिपळूण । वार्ताहर ।
महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनद्वारे उपविभागीय स्तरावरील कामांच्या निविदासंदर्भात होणार्या अनियमितता व भ्रष्टाचाराबाबत बांधकाम विभागाच्या रत्नागिरी उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार, निर्देशित समस्येचे निराकरण करण्यात आले नाही तर ते आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे. याबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, गेली तीन वर्षे उपविभाग रत्नागिरी यांचे अंतर्गत विकासकामांच्या निविदांमधील अनियमिततेने बाबत संघटनेने वेळोवळी पत्रव्यवहार केला असून संबंधित कार्यालयात झालेल्या चर्चेमध्ये निविदांमध्ये होणारी अनियमितता मान्य करुन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. पण तसे न झाल्याने संघटनेने निवेदन दिले आहे. या निवदनान्वये, उपविभागीय कार्यालयाकडून निविदांच्या बाबत अनियमितेत आजही तशीच सुरु आहे. सोबत भ्रष्टाचार हा घटक आहेच. पण उपविभागीय कार्यालयाकडून निविदा प्रक्रियेमधील निविदा नोटीस उपविभागीय कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत नाही. किंबहूना कार्यालयात तसा नोटीस बोर्ड उपलब्ध नाही, निविदा स्वीकृतीसाठी निविदापेटी उपलब्ध नाही, निविदा या दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होत नाहीत किंवा निविदा प्रसिद्धीसाठी खोटे पेपर छापून घेतले जातात. निविदा मॅनेज करण्यासाठी संबधित कार्यालयाकडून 3% प्रती निविदा रक्कम मक्तेदारांकडे मागणी करण्यात येते. ठराविक रजिस्ट्रेशनचाच वापर यासाठी केला जातो व अशा रजिस्ट्रेशन वापरण्यात आलेल्या ठेकेदारांकडून काम नावावर टाकण्याच्या मोबदल्यात अजून 2% ते 3% मागितले जातात. नियमानुसार इएमडी टेंडर भरताना भरली जात नाही, नियमानुसार सिक्युरिटी डिपॉजीट कार्यारंभ आदेश देताना भरले जात नाही, आदी त्रुटींचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.