दि.बांच्या नावाचा सरकारला विसर?

विमानतळ नामकरणावर मोदी-फडणवीस गप्प

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा म्हणजे फक्त जनतेला झुलवत ठेवण्याचं राजकारण सुरू आहे, असा आरोप होत आहे. लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला द्यावे, ही उरणसह रायगड-ठाणे-नवी मुंबईच्या जनतेची दशकांपासूनची ठाम मागणी. पण, गुरुवारी उरण जेएनपीएतील सिंगापूर कंटेनर टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. त्यादरम्यान, विमानतळ नामकरणावर एक शब्दही उच्चारला गेला नाही. त्यामुळे दि.बांच्या नावाचा सरकारला विसर पडल्याची चर्चा आहे.

जनतेची मागणी दुर्लक्षित करणं म्हणजे दि.बा. पाटलांचा आणि स्थानिकांचा थेट अपमान आहे. मराठा आरक्षणासाठी हजारोंनी एकजुटीने रस्त्यावर उतरून सरकारला हादरवले. पण, आपल्या समाजाने दि.बां.च्या नावासाठी तितकाच लढा दिला का? नाही! म्हणूनच सरकारला टाळाटाळ करणं सोपं जात आहे. आपण उठलो नाही, तर उद्या या विमानतळाला कुणा उद्योगपतीचं नाव मिळेल आणि जनता बघत राहील, असे बोलले जात आहे.

त्यात भर म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न अद्याप जिवंत आहे. विमानतळावर स्थानिकांना नोकरी मिळावी म्हणून प्रशिक्षण केंद्राची मागणी होत आहे, पण सत्ताधारी बहिरे-आंधळे बनले आहेत. हे सगळं म्हणजे सरळसरळ जनतेवर अन्याय आहे, असा आरोप करण्यात येत आहे. दि.बा. पाटलांच्या नावासाठी आणि स्थानिक रोजगारासाठी आता एकजूट होऊन रस्त्यावर उतरलंच पाहिजे. अन्यथा ‌‘करू करू‌’ म्हणत सरकार दुसरंच नाव लादेल आणि आपण मुकाट पाहात राहू, अशी चर्चा आहे.

Exit mobile version