बाळासाहेबांमुळेच मोदी देशाचे पंतप्रधान

भास्कर जाधवांची भाजपावर टीका
। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवसेना-भाजप युती तुटल्यापासून उभय पक्षांमध्ये सुरू झालेले वाकयुद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आता तर कोकणातील शिवसेना नेत्याने पंतप्रधानांवर टिकास्त्र डागले आहे. सावर्डे येथील मेळाव्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी, कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचे अस्तित्व केव्हाच संपले असते, असे वक्तव्य केले आहे.
यासंदर्भातील वक्तव्यात ते पुढे म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाषण करताच भाजपवाल्यांची कोल्हेकुई सुरू झाली. भाजपाचे षडयंत्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त मराठी माणसांवरच कारवाई करता. यापूर्वी ईडी, एनसीबी, सीबीआय नव्हती का? जरा विरोधात बोलले की चौकशी लावतात. मराठी माणसाला संपवण्याचे काम सुरु आहे. हे केवळ मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्याकरता सुरु आहे. हे भाजपावाले शिवसेनेचे बोट धरून आज महाराष्ट्रात मोठे झाले.
यावेळी गोधरा हत्याकांडाचा संदर्भ देत जाधव म्हणाले की, गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. त्यावेळी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही, असे बाळासाहेबांनी म्हटले. बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवलात, असा उपरोधिक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

Exit mobile version