रामलीला मैदानातून राहुल गांधींचा घणाघात
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. जर अशा पद्धतीनं भाजपानं निवडणूक जिंकली, तर देशातील संविधान संपेल आणि देशभरात आग लागेल, अशी चिंता राहुल गांधी यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या अटेकच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने रविवारी (दि. 31) एकत्र येत दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढली. यावेळी बोलताना राहुल गांधींनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. या रॅलीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली. या रॅलीत देशभरातील 28 पक्ष सहभागी झाले होते. या महारॅलीला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे फारूक अब्दुल्ला, सिताराम येचूरी, डी. राजा, राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, प्रियंका गांधी, सुनिता केजरीवाल, एमके स्टॅलिन, चंपई सोरेन, कल्पना सोरेन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. जेव्हा बेईमानीने अंपायरवर दबाव टाकून, खेळाडूंना विकत घेऊन किंवा कर्णधाराला घाबरवून मॅच जिंकल्या जातात, तेव्हा क्रिकेटमध्ये याला मॅच फिक्सिंग म्हटलं जातं. आपल्या समोर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये अशाच पद्धतीने मॅच फिक्सिंग सुरू आहे, असं म्हणत अंपायर कोणी निवडले तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यांनी मॅच सुरू होण्यापूर्वीच आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक केली. त्यामुळे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला आहे. तसंच, ‘400 पार’ जागा जिंकण्याची भाजपाकडून घोषणा केली. मात्र, ईव्हीएम, मॅच फिक्सिंग, प्रेसवर दबाव न टाकता हे 180 सुद्धा जागा जिंकणार नाहीत, असा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.
भाजपचा लोकशाहीवरील हल्लाः पवार भाजपला विरोध करणाऱ्या खासदार, आमदार, मंत्री यांना बंदी बनवण्याचं काम या सरकारने केलं आहे. हा देशाच्या संविधानावरचा आणि लोकशाहीवरचा हल्ला असून, अशा हल्लेखोरांविरोधात मतदान करा ,असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात ज्या प्रकारची कारवाई भाजप सरकारने केली आहे, तो लोकशाही आणि देशाच्या संविधानावरचा हल्ला आहे. जर संविधान आणि लोकशाहीला वाचवायचं असेल, तर भाजपच्या अशा कृत्यांविषयी विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्या प्रकारे केजरीवाल, सोरेन यांना जेलमध्ये टाकण्यात आलं किंवा महाराष्ट्र, पश्चिम बंगालचे आमदार-खासदार यांच्याविरोधात कारवाई केली गेली, तो लोकशाही आणि संविधानावर केलेला हल्ला आहे.
अब की बार, भाजपा तडीपारः ठाकरे
भारतीय जनता पक्ष ‘अब की बार 400 पार’ असा नारा देते. पण, मी मुंबईत म्हणालो त्याप्रमाणे ‘अब की बार, भाजपा तडीपार’ म्हणत हुकुमशाहीचा अंत करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या महारॅलीमध्ये केले. आम्ही सर्व इथे निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत. कल्पना सोरेन आणि सुनिता केजरीवाल या हिंमतीने लढत असून, त्यांच्यामागे संपूर्ण देश उभा आहे. आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असल्याचा संशय होता, मात्र हा संशय खरा ठरला आहे. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक करून लोकांना भीती दाखवता येईल असे भाजपाला वाटत होते, पण त्यांनी देशवासियांना ओळखलेले नाही. देशातील नागरिक घाबरणारा नाही, तर लढणारा आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.