। वर्धा । वृत्तसंस्था ।
राजकीय पक्ष, नेते, उमेदवार, कार्यकर्ते यांना माहित असलेल्या आचार संहितेतील तरतुदी सामान्य नागरिकांस माहित असतीलच असे नाही. या तरतुदी माहित नसणारा सामान्य व्यक्ती पण प्रसंगी अडचणीत येवू शकतो, अशी ही तरतूद म्हणता येईल.
या निवडणूक काळात प्रवासात किंवा स्वतःजवळ 50 हजार रुपये बाळगता येतात. त्यापेक्षा अधिक रक्कम तपासणीत दिसून आल्यास तुम्हास चौकशीस सामोरे जाण्याची आपत्ती आहे. 50 हजार रुपये जर प्रवासात नाक्यावरील स्थिर तपासणी पथक किंवा भरारी पथक यांना तुमच्याजवळ आढळल्यास त्याचा हिशोब तुम्हास द्यावा लागणार आहे. म्हणजे हे पैसे कुठून आणले, कशासाठी काढले, कोणास देणार अशी प्रश्न सरबत्ती होणार. त्यासाठी जवळ पुरावा असणे आवश्यक आहे. म्हणजे बँकेतून काढले असल्यास तसा पुरावा लागणार आहे.
चेक देऊन काढले असल्यास चेकची झेरॉक्स किंवा तांत्रिक पुरावा म्हणजे बँकेचा पैसे काढल्याचा एसएमएस संबंधित तपासणी अधिकार्यांस दाखवावा लागेल. तो नसेल तर मग तुमच्याकडील पैसे अधिकारी ठेवून घेईल. त्याची पावती देईल. व सदर रकमेचा पुरावा दिल्यानंतर तुमचे पैसे तुम्हास परत मिळतील. पण याबाबत निवडणूक संहिता थोडी उदार पण आहे. पैसे घेऊन जाणारी व्यक्ती कोण व कशी आहे हे प्रथमदर्शनी सहज ओळखता येवू शकते. म्हणजे शेतकरी शेती खर्चाचे किंवा माल विक्रीचे पैसे घेऊन जात असेल तर त्यास नाहक त्रास देवू नये, खरं काय ते ओळखावे असे धोरण आहे.
पण सामान्य माणूस या तपासणीत गोंधळून जातो. त्याच्याकडे असणार्या रकमेचे त्यास योग्य समर्थन करता येईलच असे नाही. अश्या वेळी अधिकारी कसं आहे यावर सगळे काही अवलंबून असते, असे एका अधिकार्याने नमूद केले.समजा जवळ असलेल्या अधिकच्या पैश्याचे समर्थन पुराव्याशिवाय करता आले नाही तर ते पैसे ठेवून घेत त्या व्यक्तीस बँकेकडून पैसे काढले असे लिहून असणारा कागद आणावा लागणार. याची स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस आहे. त्यानुसार कार्यवाही होणार. पण वाद होवू नये म्हणून असलेल्या रकमेचा पुरावा जवळ ठेवणे केव्हाही चांगले, असे सांगण्यात आले.





