पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


। मुंबई । प्रतिनिधी ।
हवामान खात्यानं पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्यानं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तसेच पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. पाऊस, पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी सचिवांना जिल्ह्यात जाण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाची परिस्थिती हाताळण्यासाठी सचिवांना जिल्ह्यात जाण्याचे दिले निर्देश दिले आहेत. मात्र, आता थेट जिल्ह्यात जाऊन देखरेख आणि नियंत्रण करण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक पालक सचिवांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पूर परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळं वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीचा वेळीच सूचना द्यावी. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावं लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळं या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणं, प्रसंगी त्यांना हलविणं तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Exit mobile version