राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात महायुतीला यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी पुन्हा आपली वर्णी लागेल अशी भाबडी आशा बाळगून राहिलेल्या एकनाथ शिंदेंचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपाने सत्ता येताच आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून, देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराज झालेले शिंदे आजारी असल्याचे सांगत विश्रांतीसाठी सातारा येथील आपल्या दरे गावी गेले आहेत. त्यांच्या समर्थकांकडून ते नाराज नाहीत, अशी सारवासारव करण्यात येत असली तरी ही गोष्ट लपून राहिलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे कारभारी होणार असल्याने शिंदे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटत आला तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं हे निश्चित होत नसल्याने नव्या सरकारचा शपथविधी होत नसल्याचे बोलले जात होते. मात्र, गुरुवारी रात्री दिल्लीत झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपकडेच राहणार असल्याच स्पष्ट करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी सूचना त्यांना भाजपकडून करण्यात आली आहे. पण, शिंदे गटाला गृहमंत्री, नगरविकास, सार्वजनिक आरोग्य यासारखी महत्त्वाची खाती हवी आहेत. काही झाले तरी गृहमंत्रीपद दिलं जाणार नसल्याची खात्री पटल्याने शिंदे अस्वस्थ झाले आहेत. यामुळे महायुतीची बैठक ठरलेली असताना ते आपल्या सातार्यातील दरे या गावी निघून गेले.
‘शिंदेंना हवंय गृहमंत्रीपद’
महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी स्पष्ट चिन्हे आहेत. कोणत्याही परिस्थितीत गृहखाते सोडणार नाही, अशी भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याचा कारभार राहणार असल्याचा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा असेल, तर गृहमंत्रीपट शिंदे गटाला हवेय, अशी मागणी करणार्या एकनाथ शिंदेंची पुरती कोंडी भाजपाने केली आहे.
गुरुवारी शपथविधी?
महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी गुरुवारी (दि. 05) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जात आहे. दादर येथील शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर येत्या 2 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याचं ठरत होतं. मात्र, 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवतीर्थ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे 5 डिसेंबरला आझाद मैदानावर हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.