मुंबई इंडियन्सची पंजाबवर मात

| मोहाली | वृत्तसंस्था |

मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला. पंजाबच्या संघानं दिलेलं 215 धावांचं आव्हान मुंबई सहज पार केलं. घरच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पराभवाचा बदला मुंबईनं पंजाबचा आयएस बिंद्रा स्टेडियम मोहालीमध्ये पराभव करुन घेतला. मुंबईकडून इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा, टीम डेविड यांनी महत्त्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, पुन्हा एकदा पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग चर्चेत आला आहे.

पंजाबच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना लियाम लिविंगस्टोनच्या 82 धावा आणि जितेश वर्माच्या 49 धावांच्या जोरावर 214 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. कॅमेरुन ग्रीननं आक्रमक खेळी केली पण त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ग्रीन 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादवनं मुंबईच्या संघाच्या विजयाचा पाया रचला. इशान किशननं 75 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवनं 66 धावा केल्या. दोघांनी मुंबईच्या संघासाठी 100 धावांची भागिदारी केली. तिलक वर्मा आणि डीम डेव्हिडनं इशान आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्मानं एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 10 चेंडूमध्ये 26 धावा केल्या. तर, टीम डेव्हिडनं 19 धावा करत 215 धावांचं आव्हान 19 व्या षटकामध्ये पार केलं.

मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंह यानं दोन स्टंप मोडले होते. पंजाबच्या त्या विजयानंतर अर्शदीपची मोठी चर्चा झाली होती. या सामन्यात अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीची मुंबईच्या फलदाजांनी धुलाई केली. अर्शदीप सिंहनं 4 षटकामध्ये 66 धावा दिल्या. मुंबईच्या फलंदाजांची अर्शदीप सिंगची धुलाई केल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलं आहे. अर्शदीप सिंगनं दिलेल्या धावांचा उल्लेख करत मुंबई पोलिसांनी पंजाब किंग्जला आम्ही यशस्वीपणे गुन्हेगारांना पकडतो आणि शिक्षा देतो, असं ट्विट करत डिवचलं आहे.

Exit mobile version