। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा एका अपघातामुळे गुरुवारी (दि.5) तात्पुरती विस्कळीत झाली. विजयदुर्ग बंदरात उभ्या असलेल्या रो-रो बोटीला मालवाहू टग बोटीने जोरदार धडक दिली. या अपघातामुळे बोटीचं नुकसान झालं असून, प्रवाशांचे हाल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र तांत्रिक बिघाडामुळे काही प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करण्याची वेळ प्रशासनावर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्चपासून सुरू झालेल्या या जलवाहतुकीला कोकणवासीयांचा आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी ही रो-रो बोट विजयदुर्ग बंदरात प्रवाशांना घेण्यासाठी उभी होती. याच दरम्यान, बंदरात काही वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका छोट्या टग बोटीने रो-रो बोटीला धडक दिली. संबंधित टग बोटीच्या भोवती सुरक्षेसाठी आवश्यक असलेली संरक्षक रबर ट्यूब नव्हती. त्यामुळे रो-रो बोटीला चार छोटी छिद्रे पडली. या अपघातामुळे बोटीची सुरक्षितता लक्षात घेता काही प्रवाशांनी बोटीतून प्रवास करायला नकार दिला. परिणामी 20 प्रवासी आणि 7 वाहनांच्या बुकिंगचे पैसे प्रशासनाला परत करावे लागले. अपघातानंतर तातडीने विजयदुर्ग बंदरातच बोटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरूस्तीचं काम पूर्ण झल्यानंतर बोट प्रवासासाठी योग्य असल्याची खात्री केली. दिवसभराच्या खोळंब्यानंतर, सायंकाळी 7 वाजता ही रो-रो बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली.







