। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ जवळील अवसरे येथे आपल्या नातेवाईक यांच्याकडे मुंबई घाटकोपर येथील 19 वर्षीय तरुणाचा उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेल्यावर बुडून मृत्यू झाला आहे. या तरुणाचा मृतदेह दुसर्या दिवशी सोमवारी (23 मे) नदीच्या किनारी बाहेर आल्यानंतर तो शवविच्छेनानंतर नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला.
घाटकोपर येथील रहिवाशी असलेला इम्तियाज अहमद हलीम खान हा 19वर्षीय तरुण आपल नातेवाईक यांच्याकडे अवसरे येथे आला होता.22मे रोजी दुपारी हा तरुण अन्य चार जणांसह उल्हास नदीवर बांधण्यात येत असलेल्या शेलु- मोहीली या दरम्यान होत असलेल्या पुलाच्या बाजूला पोहण्यासाठी पोहचले होते. दुपारी तेथे पोहत असताना चार वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण खोल पाण्यात बुडत असताना त्यातील एक तरुण इतरांच्या मदतीने बाहेर आला आणि त्यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र इम्तियाज अहमद हलीम खान हा तरूण खोल पाण्यात बुडाला.त्यानंतर पुलावर काम करणारे कामगार आणि स्थानिकांनी त्या तरुणाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर नेरळ पोलिसांनी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमला पाचारण करण्यात आले.त्याआधी नेरळ पोलीस ठाण्याचे पथक तसेच स्थानिक शेलु ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी खारीक हे स्वतः देखील बुडालेल्या तरुणाला शोधण्यासाठी नदीत उतरून शोध घेत होते, मात्र अंधार पडल्याने रेस्क्यू थांबवण्यात आले.
सोमवारी सकाळी साडे सात वाजता इम्तियाज अहमद हलीम खानचा मृतदेह नदीच्या कडेला तरंगला होता.त्यावेळी आलेल्या पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आणि शविच्छेदन करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. गतवर्षी याच भागात शेलू येथील चाळी मध्ये राहण्यासाठी आलेल्या एकाचा पोहण्यासाठी आले असता बुडून मृत्यू झाला होता.