पहिल्या कसोटीत मुंबईकर खेळाडूचे पदार्पण

कॅप्टन रहाणेची घोषणा
। कानपूर । वृत्तसंस्था ।
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे प्रमुख बॅटर कानपूर टेस्ट खेळणार नाहीत. तर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या दोन मुंबईकरांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
सूर्यकुमार यादवचा टेस्ट टीममध्ये समावेश नव्हता. पण, केएल राहुल जखमी झाल्याने मंगळवारी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कानपूरमध्ये विराट कोहलीच्या जागेवर श्रेयस आणि सूर्या या दोन मुंबईकरांपैकी कोण खेळणार याची उत्सुकता होती. टीम इंडियाचा कानपूर टेस्टमधील कॅप्टन अजिंक्य रहाणेने ही उत्सुकता संपवली आहे. कानपूर टेस्टमध्ये अय्यर खेळणार असल्याचे रहाणेने जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पहिल्यांदाच मुंबईकर श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे.
श्रेयसने आजवर 92 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 52.18 च्या सरासरीने 4592 रन काढले आहेत. यामध्ये 12 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 202 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. टीम इंडियाची मिडल ऑर्डर हा इंग्लंड दौर्‍यात चिंतेचा विषय होता. मिडल ऑर्डरची ही चिंता दूर करण्यासाठी श्रेयसवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे यांनी विश्‍वास दाखवला आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्‍विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.

Exit mobile version