। कोलकाता । वृत्तसंस्था ।
कोलकाताने तिसरी ट्रॉफी जिंकून त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोलकाताच्या विजयात मेंटर गौतम गंभीरचा मोठा वाटा आहे. याचे श्रेयही त्याला दिले जात आहे. याशिवाय श्रेयस अय्यरनेही अप्रतिम कर्णधारपद केले आहे. पण गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर यांनी कोलकाताला ट्रॉफी मिळवून दिली असली तरी पडद्यामागील मुंबईच्या दिग्गज खेळाडूचेही योगदान महत्वाचे आहे.
कोलकाताच्या विजयात सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा मोठा वाटा आहे. अभिषेक नायर कोलकाताचा प्रमुख चेहरा कधीच बनला नसला तरी पण त्याने ज्या पद्धतीने हा संघ तयार केला आहे ते कौतुकास्पद आहे. कोलकाताला 10 वर्षांनंतर आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. या विजयानंतर कोलकाताचे स्टार खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर यांनीही अभिषेक नायरचा उल्लेख केला आहे. या संघाला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तयार करण्यात अभिषेक नायरने महत्त्वाची भूमिका कशी बजावली हे त्यांनी सांगितले.
अभिषेक नायर सुमारे 4 वर्षांपूर्वी कोलकातामध्ये सामील झाला आणि तेव्हापासून तो संघ तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. या विजयानंतर वरुण चक्रवर्ती म्हणाला की, अभिषेक नायरने केकेआरमध्ये भारतीय खेळाडूंचा मजबूत गाभा तयार करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय अभिषेक नायरमुळे माझ्या फलंदाजीत सुधारणा झाल्याचेही व्यंकटेश अय्यरने सांगितले. अभिषेक नायर ही अशी व्यक्ती आहे ज्याने अनेक खेळाडूंचे करिअर उंचावण्यास मदत केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि श्रेयस अय्यर यांनीही फलंदाजी सुधारण्याचे श्रेय अभिषेक नायरला दिले आहे. रिंकू सिंगनेही आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे, त्याने याचे श्रेयही अभिषेक नायरला दिले आहे. याच कारणामुळे पडद्यामागे मेहनत घेऊन संघाला तयार करणार्या अभिषेक नायरला कोलकाताचा किंग मेकर म्हटले जात आहे.