। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील खाड्याचापाडा येथील तरुणाचा गुरुवारी मध्यरात्री खून झाला. मयत तरुणाला रायगड पोलिसांनी मोक्का लावला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्याच मित्राने सहकार्याच्या सहकार्याने लोखंडी हत्याराने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, मयत तरुणाचे त्याचा गुन्ह्यातील साथीदाराच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून पोलिसांनी खून करणार्या दोन्ही तरुणांना अटक केली आहे.
![](http://krushival.in/grygrars/2022/05/neral1-1024x500.jpg)
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील खाड्याचापाडा येथील सुभाष रामू खाडे हा गुरुवारी (दि.19) रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे मोठे भाऊ गणेश रामू खाडे हे त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मित्राकडे पाषाणे कातकरीवाडी येथे पोहचले. त्यावेळी तेथे मोतीराम बबन वाघ आणि शंकर नथू वाळवी हे दोघे लोखंडी हत्याराने सुभाष खाडे यास मारत होते. त्याच्या मदतीला गणेश जात असल्याचे पाहून त्या दोघांनी त्यास जखमी अवस्थेत टाकून पलायन केले. याबाबत गणेश खाडे याने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेने सुभाष खाडे यास कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
या घटनेनंतर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शेखर लाव्हे आणि सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे यांनी पाषाणे कातकरी वाडीमध्ये खुनाचा तपास सुरु केला. मध्यरात्री पोलीस उप अधीक्षक विजय लगारे आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या देखील पोहचल्या. तर शुक्रवारी (दि.20) दुपारी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
पोलिसांनी गणेश रामू खाडे यांच्या तक्रारीनंतर मोतीराम बबन वाघ आणि शंकर नथू वळवी या दोघांना मध्यरात्री ताब्यात घेऊन सुभाष रामू खाडे याचा खुन केल्याप्रकरणी अटक केली. त्या दोघांवर नेरळ पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक विजय लगारे यांच्याकडे आहे.
दारु पाजून काढला काटा
या खुनाबद्दल पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता खून झालेला तरुण हा रायगड पोलिसांकडून तडीपार केलेला गुन्हेगार तरुण होता. त्याचवेळी त्याला मोक्का लावल्याने नेरळ पोलीस देखील पाषाणे खाडयाचापाडा येथे त्याचा शोध घेण्यासाठी जात होते. मात्र पोलिसांना कधीही त्या भागात न सापडलेला सुभाष खाडे हा तरुण सापडला तो थेट मृत अवस्थेतच. त्याचा खून करणारा मोतीराम बबन वाघ याने आणि मयत सुभाष खाडे हे दोघेही एका गुन्ह्यात सहभागी होते. एकमेकांचे मित्र असलेले हे दोघे ऐकमेकांच्या घरी देखील जात असत. तर मयत सुभाषचे आपल्या पत्नीकडे वाईट दृष्टीने नज़र असून तिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने मोतीराम वाघ याने सुभाषला कातकरी वाडी येथे बोलावले आणि त्याला दारू पाजून मित्र शंकर वळवी असे दोघांनी लोखंडी हत्याराने मारले.