नागावच्या लॉजवर दुसऱ्या बायकोचा खून, वर्षानंतर सासूलाही संपवलं, पण चष्म्याने जावई अडकला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मायलेकीच्या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकलण्यात अखेर उरण पोलिसांना यश आलं आहे. मुख्य आरोपीसह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहा जुलै रोजी उरण तालुक्यातील पिरकोन-सारडे गावातील रस्त्यावर ५४ वर्षीय भारती आंबोरकर मृतावस्थेत सापडल्या होत्या. त्यांच्या मानेला मागून बाजूने भोसकल्याच्या खुणा होत्या.

पोलीस तपासात धक्कादायक बाबींचा उलगडा झाला. ४५ वर्षीय मुख्य आरोपी मयुरेश गंभीर याने आपली दुसरी बायको प्रिती गंभीर (३२) हिची ऑगस्ट २०२२ मध्ये हत्या केली होती. प्रिती ही भारती आंबोरकर यांची कन्या होती.

मयुरेशसह पोलिसांनी दिलीप जंगलकर, दीपक निशाद आणि अब्रार अन्सार या त्याच्या तीन साथीदारांनाही अटक केली आहे. मयुरेश गंभीर हा सराईत गुन्हेगार आहे. २०१४ मध्ये अलिबाग येथील एका स्थानिकाच्या हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती. अलिबाग कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र २०२२ मध्ये पुराव्याअभावी हायकोर्टाने त्याची सुटका केली. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

दहा जुलैला पिरकोन-सारडे गावातील रस्त्यावर सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची चौकशी करताना घटनास्थळी पोलिसांना चष्म्याचे कव्हर सापडले होते. त्यावरुन पोलीस आंबोरकरांच्या डोंबिवलीतील घरापर्यंत पोहोचले. ९ जुलैला भारती यांना जावई मयुरेशने अलिबागमधील पोयनाड येथे बोलावले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी मयुरेशला डोंबिवली पूर्वेकडील पलावा भागातून उचललं. चौकशीदरम्यान त्याने सासूबाईंची हत्या केल्याची कबुली दिली. तिघा साथीदारांच्या मदतीने आपल्या गाडीतच त्यांचा जीव घेतल्याचं त्याने सांगितलं. डोक्यात दोन गोळ्या झाडून रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह टाकला. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी मानेवर मागच्या बाजूने भोसकल्याचंही त्याने सांगितलं.

यावेळी, आपली दुसरी पत्नी प्रितीची हत्या केल्याचीही कबुली त्याने दिली. अलिबागमधील लॉजवर नेऊन तिचा गळा दाबल्याचं त्याने सांगितलं. २०१४ मध्ये कारावासात जाण्यापूर्वी दिलेले नऊ लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने प्रितीचा खून केल्याचं मयुरेशने सांगितलं. तर प्रितीच्या हत्या प्रकरणात सासू फिर्यादी असल्याने तिचाही काटा काढल्याचं त्याने सांगितलं.

Exit mobile version