मंत्री पुत्राची दबंगगिरी; हवालदिल शेतकरी

मुश्रीफांच्या सुपुत्राने अडवला शेतकऱ्यांचा रस्ता
शेतकऱ्यांनी मागितली तहसीलदारांकडे दाद

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांची मानकीवली येथे तर त्यांच्या सुपुत्राच्या नावावर पोशीर येथे जमीन आहे. वडिलांच्या मंत्रीपदाचा वापर करीत त्यांच्या मुलाने पोशीर येथील जमिनीवर दगडी कुंपण घालण्यास सुरुवात केली असून आजुबाजूच्या शेतकऱ्यांचा रस्ता अडविला आहे. दरम्यान, रस्ता अडवला गेल्याने शेतकरी अडचणीत आला असून त्यांनी माध्यमांना याबाबत माहिती देत कर्जत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

पोशीर गावातील स्थानिक शेतकरी परशुराम गोपाळ हाबळे यांची शेती सध्या अडचणीत आली आहे. त्यांच्या शेतीकडे जाण्याचा रस्ता दगडी बांधकाम सुरू करून अडवण्यात आला आहे. मागील आठ ते दहा दिवसात तेथे बांधकाम करून शेतकऱ्याचा रस्ता बंद करण्याचा प्रताप मंत्री पुत्राने केला आहे. पूर्वीपासून शेतीसाठी लागणारी अवजारे नेण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी हा रस्ता खुला करण्यात यावा, यासाठी 16 मार्च 2026 रोजी कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना पत्र देण्यात आले होते.शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान क्रांती संघटनेकडून शेतकरी परशुराम हाबळे यांच्या उपस्थितीत न्याय मिळवून देण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती. हाबळे यांच्या मालकीच्या शेतीमध्ये कुंपण घालण्यासाठी खोदकाम करण्यात येऊ लागले. कोणीतरी खोदकाम करीत आहे, हे समजल्यावर हाबळे हे आपल्या शेतीकडे गेले असताना तेथे असलेल्या व्यक्तींनी परशुराम हाबळे यांना धमकावले आणि पुन्हा इकडे यायचे नाही, असे सुनावले. याबाबत शेतकरी पोलीस ठाण्यात पोहचले असता कोणीही दखल घेत नव्हते.

अखेर शेतकऱ्यांनी माध्यमांना ही बाब सांगितल्यावर ही जमीन राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या नावे असल्याचे समजले. याच मंत्री महोदयांची मानकिवली येथे देखील जमीन असून मंत्र्याच्या सुपुत्र असल्याने पोलीस आणि महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या अन्यायाला न्याय देऊ शकत नाहीत. अधिकारी हतबल असल्याने शेतकऱ्याच्या पाठीशी किसान क्रांती संघटना उतरली असून मंत्र्यांचा मुलगा असला तरी आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार, असा निर्धार किसान क्रांती संघटनेने केला आहे.शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किसान क्रांती संघटनेने पाहणी केली असता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन देखील मंत्र्यांच्या सुपुत्राच्या चेल्यांनी बळकावली असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी तेथे काम पाहणारे मंत्र्याचे सुपुत्राचे चेले हे आमचे कोणीही काहीही करू शकत नाही, आमच्या पाठीशी कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही, पत्रकार पण काही करू शकत नाहीत, अशा बढाया मारीत होते.

जमिनीवर केले जात असलेल्या अतिक्रमण प्रकरणी कळंब येथील आऊट पोस्टमध्ये शेतकरी रोशन परशुराम हाबळे पोहचले असता त्यांना देखील पोलिसांनी थारा दिला नाही. त्यानंतर कळंब येथे शासनाचे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू असताना संबंधित शेतकरी तेथे पोहचले. त्यावेळी तहसीलदार जाधव यांनी मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांना तात्काळ पंचनामा करावा आणि अहवाल सादर करावा, असे सूचित केले. मात्र, आठ दिवसात मंडळ अधिकारी देखील त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पोहचले नाहीत.

शेतात आल्यावर दमदाटी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. राब भरण्याची वेळ आली आहे. सध्याच्या दिवसात भात शेती करण्यासाठी राब जाळला जातो, मात्र इथे आल्यावर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे वडील शेत जमिनीकडे येत नाही. साजिद हसन मुश्रीफ यांचे नावे आजूबाजूची जमीन असून शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्याची बंदी घातली गेली आहे.

– रोशन हाबळे, शेतकरी

जंगल जमीन विकली असता शेतजमीनही लाटण्याचा प्रयत्न मंत्री हसीन मुश्रीफ यांचा आहे. आमची सातबारा उतारा यावरील लागवडीखाली नसलेली जमीन विकण्यात आली होती. मात्र त्यांनी सर्व जमीन हडपली. माझी जमीन मी 35 वर्षे जुनी आहे. त्या जमिनीत झोपडी असून ही जागा विकली नाही. त्यामुळे मी इथून झोपडी काढणार नाही. त्यांनी झोपडी मोडण्याचा प्रयत्न केला. मंत्री हसीन मुश्रीफ या अन्यायाला जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचा रस्त्याची अडवणूक केली जात आहे.

– जिजाबाई राणे, शेतकरी, पोशीर

Exit mobile version