| नागपूर | प्रतिनिधी |
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपराजधानी नागपुरात गुरुवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी आत्महत्या, दुष्काळ बेरोजगारी, महागाई, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तिढा, या विषयावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी आक्रमक होत गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, आदी सगळ्याच विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच दालनात
सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडूनही शरद पवार गटाच्या नेत्यांनी अधिवेशनात वेगळ्या दालनाची मागणी केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणतेही गट तट नसल्याच्या शरद पवार यांच्या दाव्याला पुष्टीच मिळाली आहे.राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नागपूर हिवाळी अधिवेशनात एकच दालन देण्यात आलं आहे.