जनार्दन पाटील
चीन आणि पाकिस्तानच्या अभद्र युतीमुळे काश्मीरचे नंदनवन पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांचे केंद्रस्थान बनू पाहत आहे. याचे परिमाण म्हणजे अलिकडेच उरी सेक्टरमध्ये मारल्या गेलेल्या अतिरेक्यांकडून सापडलेली सर्व शस्त्रे चीनमध्ये तयार झालेली होती. ‘आयएसआय’ दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये ढकलण्यासाठी 1990 चे धोरण अवलंबत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचा बिमोड करणे हे मोठे आव्हान आहे.
काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर तिथे सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याचा दावा केला जात होता. आत्तापर्यंत विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या या भागात संपन्नता येण्याची स्वप्ने पाहिली जात होती. खोऱ्यातील लष्करी चौक्यांची संख्या कमी होऊन सर्वसामान्य भयमुक्त अवस्थेत वावरु शकतील आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धीनंतर तेथील पर्यटन व्यवसायालाही नवे आयाम मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अलिकडील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तर पुढच्या नऊ महिन्यात तिथे विधानसभेच्या निवडणुकाही घ्याव्या लागणार आहेत. त्यापूर्वी देशात लोकसभेची निवडणूक होईल. त्यामुळे आता सर्व काही सुरक्षित होण्याचे स्वप्न पाहिले तरी पाकिस्तान ते प्रत्यक्षात येऊ देत नाही, हेच वास्तव आहे. एकीकडे मागील सर्जिकल स्ट्राईक आणि पाकमध्ये भारताच्या शत्रूंचा होणारा खात्मा यामुळे आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी देशात पडद्यामागून इसिससह अन्य संघटनांच्या सुरू असणाऱ्या हालचाली पाहिल्या तर आपल्याला किती जागरूक राहावे लागेल, हे नेमकेपणाने समजते. हे साधले तर नवीन वर्ष खोऱ्यातील सामान्यांसह देशातील नागरिकांनाही सुरक्षित असल्याची भावना प्रदान करु शकेल. मात्र या दृष्टीने पाहता काश्मीरमधील मध्यंतरीची घटना विसरुन चालणार नाही. मागे दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये हल्ला केला होता, काश्मीरमध्ये मध्यंतरी लष्करी जवानांवर झालेला हल्ला त्याचीच पुढची कडी होती की काय, अशी चर्चा होऊ लागली.
एकंदरच गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. पूंछमध्ये लष्कराच्या वाहनांवरील हल्ला त्यातील एक असून चकमकीत चार जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यानंतर अखनूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला आणि एका निवृत्त एसएसपीला दहशतवाद्यांनी मशिदीतच गोळ्या घातल्या. त्यामुळे सरकार करत असलेल्या बदलाच्या आणि शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसला. हे काश्मीरमध्ये प्रत्यक्षात अनुभायला मिळाले आहे. खेरीज त्यानंतर खोऱ्यातील सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मात्र या सगळ्यामागे पाकिस्तानच्या कारवाया असून सरकार लवकरच अशा सर्व घटनांना आळा घालणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. आता 2024 मध्ये हे बोल खरे ठरण्याची अपेक्षा आहे.
सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील 370 वे कलम रद्द केल्यानंतर दहशतवाद पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सीमेवर किंवा दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी आपली पकड मजबूत केली असून या प्रक्रियेत काश्मीर पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. खरे सांगायचे तर गेल्या काही वर्षांपासून पोलिस त्याच भूमिकेत आहेत. त्यामुळे अशा कारवाया करुन पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवृत्त एसएसपी मुहम्मद मीरबद्दल 70 वर्षांचे होते. ते मोएझिनच्या भूमिकेत होते. तिथे त्यांची हत्या करण्यात आली. म्हणजेच दहशतवादी धर्माचाही विचार करत नाहीत, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. यासाठी ते काहीही करायला तयार दिसतात. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या भूमिकेकडे मोठ्या परीपेक्ष्यात पाहावे लागेल.
सध्या चीन आणि पाकिस्तान अनेक क्षेत्रात एकत्र काम करत आहेत. पाकिस्तान आपल्याच मुद्द्यांमध्ये अडकला असला तरी तिथे भारतविरोधी मानसिकतेला प्रोत्साहन दिले जाणे काही कमी झालेले नाही. अंतर्गत परिस्थिती काहीही असली तरी तिथल्या लष्कराचे अस्तित्व याच मुद्द्यावर अवलंबून असते असे म्हणणे अयोग्य ठरत नाही. त्यामुळेच तेथील कट्टरतावादी आणि लष्कर कायम भारतविरोधी भूमिका घेत आहेत. याद्वारे आपणकाश्मीरमध्ये काहीही करू शकतो, हे त्यांना दाखवायचे आहे. काश्मीरमध्ये शांतता नाही, असे जगाला दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चीनचीही भूमिका अशीच आहे. पूर्व लडाखमध्ये चीनवर एक प्रकारचा दबाव आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरला लागून असणाऱ्या भागाबाबत चीन सातत्याने भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतो. ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ला असणारा भारताचा विरोध चीनला सहन होत नाही. बलुचिस्तानमधून जाणाऱ्या भागामध्ये चीन आपल्या गुंतवणुकीकडे आशेने पाहत होता. मात्र त्याची पूर्तता होताना दिसत नाही. बलुचिस्तानमधील पाकिस्तानी लष्कराच्या दहशती आणि क्रूरतेच्या कहाण्या कायम पुढे येत असतात. त्यामुळेच ‘सीपीईसी’मध्ये आलेले अपयश झाकण्यासाठी भारतविरोधी कृत्य केले जात आहे. त्यातच बलुचिस्तानमधील वाढत्या दहशतवादी कारवायांमागे भारत आहे, असे पाकिस्तानला वाटते. अलिकडे पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक उघडउघड भारतात समावेशाची मागणी करताना दिसतात. हे पाकिस्तानच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.
‘सीपीईसी’ प्रकल्पातून पूर्ण न होणाऱ्या अपेक्षांमुळे पाकिस्तानचे नुकसानही स्पष्टपणे दिसून येत आहे. चीनला हवी असणारी सुरक्षा आणि इतर गोष्टी पाकिस्तानला पुरवता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी दबाव आहे. अलीकडेच इराणनेही पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांबद्दल कठोर शब्दांमध्ये फटकारले. पाकिस्तान धार्मिक, आर्थिक, दहशतवादी आणि धार्मिक अशा सर्व प्रकारच्या दुष्ट वर्तुळात अडकला आहे. तो अनेक आघाड्यांवर एकाच वेळी संघर्ष करत आहे. देशावरील आपले वर्चस्व कायम ठेवायचे असल्याने पाकिस्तानी लष्कर कुठल्याही थराला जाण्यास तयार आहे. त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अल्लाह, सेना आणि अमेरिकेने पाकिस्तानला जवळजवळ सोडले आहे. अमेरिकेला आता पाकिस्तानची गरज नाही. युक्रेन युद्धानंतर दक्षिण आशियामध्ये नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. या नव्या समीकरणात रशिया, चीन आणि पाकिस्तान आहे. पण रशिया आणि चीन एक प्रकारे युतीमध्ये आहेत आणि एका अर्थी अमेरिकाविरोधी गटाचे नेतृत्व करत आहेत. आत्तापर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानला भरपूर डॉलर्स आणि अन्य मार्गाने मदत मिळाली. अफगाणिस्तानसंबंधी त्यांनी या देशाचा पुरेपूर वापर करुन घेतला. मात्र आता ही गरजही उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ऑपरेशन ‘ऑलआउट’ सुरू होते, तेव्हा सीमेजवळ सुमारे दोनशे दहशतवादी असल्याचा आकडा वारंवार दिला जात होता. आज दक्षिण
काश्मीरमध्ये हा आकडा फक्त 30-35 च्या आसपास आहे. सक्रिय दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या दहशतवादी कारवायांचे सरासरी वय एका आठवड्यापेक्षा जास्त नाही. सुरक्षा कशी मजबूत आहे, हे यावरून दिसत असले तरी दहशतवाद्यांनीदेखील लक्ष्यित हल्ले सुरूच ठेवले आहेत. फक्त मोठ्या हल्ल्यांऐवजी आता त्यांनी लहान निवडक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. जी-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर ‘आयएसआय’ आणि पाकिस्तानी लष्कर भारताच्या दहशतीत होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी काश्मीर खोऱ्यातील तरुणांची दिशाभूल करण्याचे काम हाती घेतले आहे. याचाच दृश्य परिणाम म्हणजे अनंतनागच्या कोकरनागमध्ये स्थानिक तरुण उझैर खान लष्करी अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अधिकाऱ्याला लक्ष्य करण्यासाठी ऑपरेशनचे नेतृत्व करत होता. एवढेच नाही तर, त्यांच्या स्थानिक गुप्तचरांनी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनाही फसवले. चुकीच्या माहितीमुळे अधिकारी जाळ्यात अडकले आणि त्यातील तीन अधिकारी हुतात्मा झाले.
पाकिस्तानसोबतच्या या ‘प्रॉक्सी वॉर’मध्ये चीननेही पूर्णपणे हातमिळवणी केली असल्याची भीती आहे. याचा पुरावा म्हणजे बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून सापडलेली सर्व शस्त्रे चीनमध्ये तयार झालेली होती. ‘आयएसआय’ दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवण्यासाठी 1990 चे धोरण अवलंबत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. घुसखोरीसाठी पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात दहशतवादी आश्रय घेत आहेत. या घनदाट जंगलात मोठमोठ्या दगडी गुहा असून तिथे लपून दहशतवादी भारतीय लष्कराला हानी पोहोचवत आहेत. काही ठिकाणी अतिरेकी लष्कराच्या शोध मोहिमेवर आयईडी स्फोटांसह हल्ले करत आहेत. अनंतनाग आणि शोपियानला वेगळे करणाऱ्या पीर पंजाल रेंजच्या घनदाट जंगलात शेकडो घुसखोर दहशतवादी घटना घडवून आणण्यासाठी सक्रिय आहेत. भारतीय सुरक्षा दलांसाठी ही धोक्याची घंटा आहे. खेरीज पाकिस्तान काश्मीरमध्ये ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रेही पाठवत आहे. यासोबतच काश्मीरमध्ये नार्को दहशतवादही चालवला जात आहे. नववर्षात लष्करापुढे या सगळ्याचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
