| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या सरकारी जिल्हा ग्रंथोत्सवाचा साहित्यिक आणि साहित्यप्रेमीच्या, साहित्य संस्थांच्या सहभागाअभावी फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. त्याअर्थाने त्या उत्सव नामक अनुत्साहाला सूक्ष्म ग्रंथोत्सव म्हणता येईल. साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना सहभागी करुन न घेण्यात आल्याने पुढील वर्षी जिल्ह्यातील साहित्य संस्था, साहित्यप्रेमी यांच्या सहकार्याने ज्या दिवशी सरकारी जिल्हा ग्रंथोत्सव असेल, त्या दिवशी, तेथे जनतेचा समांतर ग्रंथोत्सव साजरा करण्यात येईल, अशी भूमिका ज्येष्ठ साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी अध्यक्षीय भाषणात घेतली.
मांडला येथील पिंगळे सिटीतील बांबू हाऊसमध्ये बुधवारी (दि. 28) संध्याकाळी पोपटी काव्य संमेलनाचे आयोजन सह्याद्री साहित्य मंडळ, अलिबाग यांच्यावतीने करण्यात आले होते. या संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक, सह्याद्री साहित्य मंडळाचे अध्यक्ष कैलास पिंगळे, साहित्यिक पां.शि. पाटील, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील 40 साहित्यिक-कवींची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी या ग्रंथोत्सवाचा प्रचार आणि प्रसार न केला गेल्यामुळे, तसेच जिल्ह्यातील, अलिबाग तालुक्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमींना, साहित्य संस्थांना सहभागी न केल्यामुळे हा ग्रंथोत्सव अलिबागेत जेथे झाला, त्या तिठ्याच्या परिसरातही याची माहिती नव्हती. याचा निषेध म्हणून समांतर ग्रंथोत्सवाची घोषणा ज्येष्ठ साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी केली.
यानंतर पोपटीचा आस्वाद घेत काव्यसंमेलनास सुरुवात झाली. त्यात कवी संमेलनाचे अध्यक्ष उमाजी केळुसकर, संमेलनाचे आयोजक कैलास पिंगळे, पां.शि. पाटील यांच्यासह 40 साहित्यिक-कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. या पोपटी काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश खडपे यांनी केले. 70 साहित्यप्रेमींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.