दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
| रायगड | खास प्रतिनिधी |
भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी दोन समाजाच तेढ निर्माण होईल असे कृत्य केले होते. तसेच उपस्थित पोलीस अधिकार्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महाड, पोलादपूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी यांना गुरुवारी दिले आहे.
17 जून 24 रोजी महाड आणि पोलादपूरमधील मुस्लिम समाज बकरी ईदचा सण साजरा करीत होते. त्यानंतर 18 जुन रोजी इसाने कांबळे येथील एका घरातील कुटुंबाने गोवंश हत्या कायद्याचे पालन केले नाही. त्या कृत्याचे मुस्लिम समाज अजिबात समर्थन करत नाही. महाड ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक भूमी आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध समाज गेल्या अनेक वर्षांपासून सलोख्याने राहतात. एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होतात, अशा चांगल्या वातावरणात आमदार नितेश राणे हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 18 जूनच्या घटनेनंतर आमदार राणे हे स्थानिक खासदार अथवा आमदार यांना याप्रकरणी कोणताही संपर्क न करता तसेच घटनेची माहिती न देता बाहेरील जिल्ह्यातून येतात. तसेच पोलिसांसमोर मुस्लिम समजाबद्दल द्वेष निर्माण होईल आणि त्यांना मोहल्ल्यात घुसून मारण्याची धमकी देत असतील, तर ते गंभीर आहे, असे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
या आधीदेखील आमदार राणे यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच देशातील आणि राज्यातील न्यायालयाने त्यांना हेड स्पिच, तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करुन नये, अशी ताकीद दिली आहे. असे असतानादेखील त्यांच्याकडून कायद्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मानपान मिळावा, लोकांनी मोठे म्हणावे याचसाठी आमदार राणे यांनी सदरचे कृत्य केल्याचे अर्जात म्हटले आहे. आमदार राणे आणि त्यांच्यासोबत असणार्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात सखोल चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना दंडीत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुस्लिम समाजाला योग्य तो न्याय मिळावा आणि दोन्ही समाजातील शांतता व सलोखा चांगला राहील याबाबत प्रयत्न करावेत, असेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, ते उपस्थित नसल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तो स्वीकारला. तसेच जिल्हाधिकार्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी बशीर चिचकर, महंमद पल्लवकर, महेबुब कडवेकर, मन्सुर देशमुख, डाॅ. इरफान अंतुले, सत्तार तरे, कुर्बान कणेकर, याशीन पेडेकर, रहेमान दुस्ते आदी उपस्थित हाेते.