28 कोटी खर्चातून उभारण्यात येणार्या पाणी योजनेसाठी पुढचं पाऊल कधी
| माणगाव | वार्ताहर |
गेले अनेक वर्षापासून निजामपूर जिल्हा परिषद गटातील, कडापे, निजामपूर व कोस्ते खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावे पिण्याच्या मुबलक व स्वच्छ पाण्याच्या प्रतीक्षेत होते. दरवर्षी ही गावे वर्षोनुवर्षे शासनाच्या पाणी टंचाई आराखड्यात कोरलेली होती. या तीनही गावाच्या जवळून काळनदी वाहते. मात्र या नदीवर शासनाने बंधारा उभा केला असता तर या गावांना पाणी टंचाईच्या झळा पोचल्याच नसत्या. मात्र, या गावांना ठोस पाणीपुरवठा योजना झाली नसल्याने या गावांना विशेषतः उन्हाळ्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागत होता.
निजामपूर हे गाव वर्षोनुवर्षे पाणीटंचाईग्रस्त म्हणून शासन दरबारी नोंदले गेले आहे. या गावाचा कायमचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी निजामपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच व निजामपूर, कडापे, कोस्ते खु. मधील ग्रामस्थ यांनी आ. भरत गोगावले यांच्यामार्फत पालकमंत्री उदय सावंत त्यांच्याकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही योजना मंजूर करून घेतली. सुरुवातीला 14 कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, हा निधी अपुरा पडत असल्याने त्यात दुरुस्त्या व वाढ करून पुन्हा या योजनेच्या निधीत वाढ करून 28 कोटी रुपये मंजूर करून घेतली त्यानंतरही या योजनेचे काम अद्यापही झाले नसल्याने ही योजना कागदावरच राहिली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी शासन कधी पुढचं पाऊल टाकणार हा संशोधनाचा विषय बनला आहे.
निजामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ रणपिसे, माजी सरपंच बाळाराम दबडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गुरव व जेष्ठ नेते कासार गुरुजी यांच्यासह अनेक नागरिकांनी रवाळजे येथून पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आ. भरत गोगावले यांच्याकडे लावून धरली होती. अखेर हा जिव्हाळ्याचा प्रश्न आ. गोगावले यांनी समजून घेवून पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रश्न लावून धरला. आणी आ. गोगावले यांच्या प्रयत्नाला यश आले असून सुरुवातीला 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर तांत्रिक मुद्दे लक्षात घेता पुन्हा या निधीत वाढ करून आणखी 14 कोटी रुपये असे एकूण 28 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे निजामपूर कायमचे पाणी टंचाई मुक्त होणार आहे. विळे भागाड एमआयडीसीतील दूषित पाण्याच्या विसर्गामुळे निजामपूर, कडापे, कोस्ते खुर्द ह्या ग्रामपंचायती वर्षानुवर्षे बाधित होत होत्या. या ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी शासन दरबारी प्रयत्न करून देखील न्याय मिळत नव्हता. परंतु, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना प्रतोद, आ. भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने 20 जून 2023 रोजी मंत्रालयात विशेष बैठकीत मंजूर केली होती.
या बैठकीत आ. भरत गोगावले यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना संपूर्ण परिस्थितिची माहिती सादर करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे कडापे ग्रामपंचायत, निजामपूर ग्रामपंचायत, कोस्ते खुर्द ग्रामपंचायत या तीनही ग्रामपंचायतीतील गावांना एक टीएमसी पाणी उपलब्ध करून त्यास आवश्यक असणार्या पाणी पुरवठा जल वाहिन्यासाठी सुरवातीला 14 कोटी रुपये मंजूर केले होते. ही पाणीपुरवठा योजना करताना अनेक तांत्रिक बाबी पुढे येत असल्याने हा निधी अपुरा पडू नये म्हणून पुन्हा वाढीव निधी मंजूर करून 28 कोटीचा भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे हे काम नजीकच्या काळात सुरु होइल, अशी आशा नागरिकांना वाटत होती. मात्र, उन्हाळा संपला तरी या योजनेचे काम सुरू झाली नसल्याने नागरिकांपुढे प्रश्नचिन्ह उभारले आहे. त्यामुळे निजामपूर ग्रामपंचायत ही टंचाईग्रस्त आराखड्यातून यंदाच्या वर्षी ही मुक्त झालीच नाही. योजना पूर्ण झाल्यास नवीन पाणी योजनेतून तीनही ग्रामपंचायतींना शुद्ध व मुबलक पाणी मिळेल अशी आशा वाटत आहे.
निजामपूर ग्रामपंचायतची भीषण पाणीटंचाई दूर झाल्यास या भागाचा विकास होणार असल्याने नागरिकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. पाणी टंचाई आराखड्यात ही गावे असल्याने या गावात व परिसरात व्यापारी, उद्योजक, गुंतवणूकदार, पर्यटक, व्यावसायिक यांनी या गावाकडे पाठ फिरवली होती. विशेषतः म्हणजे केंद्र शासनाचे रायगड जिल्ह्याचे जवाहर नवोदय विद्यालय, ग. रा. मेथा माध्यमिक विद्यालय, तलाठी, मंडळ निरीक्षक, शासकीय निमशासकीय अशी कार्यालये असून विद्यार्थी व परिसरातील नागरिक या ठिकाणी दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे पाण्याच्या दुर्भाक्षामुळे यांची कुचंबणा होत होती. रवाळजे येथील बारमाही पाणी निजामपूर, कोस्ते खुर्द, कडापे ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने नागरिकांच्या भुवया आता उंचावल्या असल्या तरी ही योजना पूर्ण करण्यासाठी शासन पुढचे पाऊल कधी टाकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.