महाड सामाजिक वनीकरण विभागाचे कामकाज ठप्प
। महाड । प्रतिनिधी ।
राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून महाड तालुक्यामध्ये वृक्षलागवड झालेली आहे; परंतु या वृक्षांच्या संवर्धनाकरिता या विभागाकडे निधीची कमतरता आहे, त्याचबरोबर येथील कार्यालयांमध्ये कर्मचारीदेखील नसल्याने कामावर परिणाम झाला आहे.पावसाळ्यामध्ये लागवड करण्यात आलेली रोपे वणव्यामध्ये नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षलागवड करण्यात आली असून, ग्रामीण भागांमध्ये रस्त्याच्या बाजूला, पडीक जागेत, डोंगराच्या उतारावर छोटी रोपे लावण्यात आली आहेत. यांतील लहान रोपे पावसाच्या पाण्यावर चांगल्या स्वरुपामध्ये राहिली आहेत. परंतु, लावण्यात आलेल्या रोपांची निगराणी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही, अशी माहिती येथील सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.
फेबु्रवारीनंतर उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर वणव्याचा धोकादेखील निर्माण होण्याची शक्यता आहे. वणव्यामुळे शेकडो रोपे नष्ट होतात. प्रचंड मेहनत आणि खर्च करुन लावण्यात आलेली रोपे फुकट जाणार असल्याने शासनाने निधी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सामाजिक वनीकरण, वन विभाग, अन्य सामाजिक संस्थांकडून प्रतिवर्षी वृक्षांची लागवड करण्यात येते. याकरिता सामाजिक आणि वन विभागाच्या नर्सरीमधून रोपे दिली जातात. यावर खर्चदेखील प्रचंड करण्यात येतो. पावसाळ्या प्रारंभी वृक्ष रोपांचे वितरण करण्यात आल्यानंतर त्याची लागवड वन आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून केली जाते. पावसाळ्यामध्ये रोपांकडे लक्ष दिले जात नाही; परंंतु पावसाळ्यानंतर रोपांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने रोपांकडे दुर्लक्ष होते. त्याचबरोबर वनप्राणी व पाळीव प्राण्यांचादेखील धोका असल्याने रोपांवर लक्ष ठेवणे तेवढेेच आवश्यक आहे.
महाड तालुक्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक परिसरांंत पारंपरिक पद्धतीने वणवे लावले जातात, यामुळे अथक प्रयत्नातून लावण्यात आलेली रोपे आगीमध्ये जळून भस्म होतात. अशा रोपांच्या लागवडीवर लाखो रुपये खर्च केले जातात, तरीही आगी लावण्याच्या घटना घडत आहेत.
दोन वर्षांत करोडोंचा खर्च
महाड तालुक्यामध्ये वनीकरण विभागाने सन 2018 ते 2020 पर्यंत केलेल्या लागवडीची माहिती दिली असून, महाड तालुक्यातील चांभारखिंड, मुठवली, वामने, शिरगाव, दादली, गोंडाळे या गावांमध्ये गट लागवड केली आहे. याकरिता 13 लाख 98 हजार 745 रुपये खर्च करण्यात आले आहेत. सन 2018-19 मध्ये 5 लाख 75 हजार रोपांची निमिती करण्यात आली, याकरिता 6 लाख 32 हजार 97 रुपये खर्च करण्यात आला. 2018 पासून तालुक्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आली असून, त्याकरिता 30 लाख 23 हजार 768 रुपये खर्च करण्यात आला. दोन वर्षामध्ये एका तालुक्यांमध्ये करोडो रुपये खर्च करण्यात आले असले तरी संवर्धन करण्यासाठी निधी नाही, तसेच कर्मचारीदेखील नाहीत. महाड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरगाव चांभारखिंड येथे सतत आगी लागत असल्याने या परिसरामध्ये वृक्षाची लागवड झाली आहे का, असा प्रश्न उभा राहातो.
- वृक्षांची लागवड करणे सोपे आहे, मात्र या वृक्षांचे संवर्धन करणे जरी अवघड असले तरी आज काळाची गरज झाली आहे. राजकीय नेते, औद्योगिक कंपन्या, ग्रामस्थांनी पुढे येऊन संवर्धनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. – अविनाश चव्हाण, जनसंवाद