अहमदनगर | प्रतिनिधी |
मी सहकार क्षेत्र तोडायला आलो नाही, जोडायला आलो आहे. पण राज्य सरकारनेही राजकारण बाजूला ठेवून सहकाराला पाहावं. कारखान्याचे संचालक कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, या आधारावर अर्थपुरवठा करू नये, असा सल्ला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत ते बोलत होते.
सहकार क्षेत्रात जो पक्षपात होत आहे. त्यात मी मूकदर्शक बनून राहू शकत नाही. हा पक्षपात होऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे. तेच सांगण्यासाठी मी आलो आहे,
अमित शहा,केंद्रीय सहकार मंत्री
प्रवरानगरमध्ये आज पहिली सहकार परिषद पार पडली. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा बोलत होते. या प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून काम केलं पाहिजे, असं सांगतानाच माझ्याकडे समस्या आल्यास सहकार कोण चालवतं ते पाहणार नाही. युनिट कसं चालंल आहे हे पाहीन. राज्य सरकारनेही तेच पाहावं, असं शहा म्हणाले.
बँका वाचविणार
आम्ही बँका वाचवण्यासाठी जे काही करायचं ते करू. बँका वाचवण्यासाठी आता नव्या कमिट्या स्थापन करणार नाही. कमिट्या तयार करून वेळ घालवणार नाही. अनके समित्या बनल्या, अनेक अहवाल आले. अहवाल रद्दीत गेले. कशाचीच अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे समितीची गरज नाही. तुमच्यासोबत बसून समस्या समजून त्या मार्गी लावू, असंही त्यांनी सांगितलं. येणार्या काळात नवं सहकार धोरण आणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.