। मुंबई । प्रतिनिधी ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात बीडमधील परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. 2008 साली परळीत झालेल्या दगडफेक प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. न्यायालयाच्या सुनावणीत सतत गैरहजर राहत असल्याने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.
2008 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाली होती. त्यावेळी संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत एसटी बसेसची काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे कार्यकर्त्यांच्या विरोधात कलम 143, 427, 336, 109 अन्वये परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन न्यायालयात केस सुरू आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांनी सहा वर्षापूर्वी न्यायालयात हजर होऊन तीनशे रुपयांचा दंड भरला होता आणि त्यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन दिला होता. पण राज ठाकरे सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने आता परळी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
22-10 2008 रोजी राज ठाकरे यांना डोंबिवलीत येथे अटक करण्यात आली होती. परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. दरम्यान सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंटवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केली होती. मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल बसचे समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.
यामध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांना जामीन मिळाला. परंतु न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. मोरे, पावडे यांनी दिला.