। गुहागर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचे काम करत आहे. मात्र त्याची मुदत पूर्ण होण्याआधीच शासनाच्या या पोषण आहार खिचडीची पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळून आल्याची घटना घडली आहे. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिली.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जानवळे फाट्याजवळ आय के टायर समोर रस्त्यालगत असणाऱ्या कचऱ्यामध्ये पोषण आहाराच्या खिचडीची पाकिटे टाकली होती. या प्रकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर आक्रमक झाले असून, हा पोषण आहार कोणत्या शाळेचा आहे, की अंगणवाडीचा आहे, याची शासनाने तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती विनोद जानवळकर यांनी दिली.