। महाड । वार्ताहर ।
रायगडातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावांना आता सर्वोत्तम पर्यटन गाव (बेस्ट टुरिझम व्हिलेज) नामांकनाची संधी उपलब्ध झाली आहे. युनाएटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने कोकणातील दुर्लक्षित गावांनाही जगाच्या पातळीवर प्रसिद्धी देण्याची संधी दिली आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गावांना नामांकनासाठी यूएनडब्ल्यूटीओमार्फत मिळालेल्या सुवर्णसंधीचा फायदा घेता येणार आहे. शिवरायांचा इतिहास सांगणारा रायगड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे, दासबोधांची जननी शिवधरघळ, अलिबागपासून मालवणपर्यंतचा समुद्रकिनारा, महड व पालीतील गणेश मंदिरे, दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरूड जंजिरा, माथेरान अशी अनेक ठिकाणे, पौराणिक दाखल्यांसह येथे आहेत. थंड हवेच्या ठिकाणांसोबत गरम पाण्याची कुंडेही आहेत. ही गावे आता पर्यटकांनी गजबजत आहेत. तर काही ठिकाणे आजही अनवट आहेत. या सर्वांना सर्वोत्तम पर्यटन गाव नामांकनासाठी प्रयत्न करणे शक्य होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आणि पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्व असलेल्या गावांना ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव’ हे नामांकन मिळण्यासाठी यूएनडब्ल्यूटीओ यांनी 15 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी http://www.unwto.org/tourism-villages/en/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी www.unwto.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वोत्तम पर्यटन गाव नामांकनाची संधी कोकणातील गावांना उपलब्ध झाली आहे. आपल्या गावाचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी जास्तीत जास्त गावांनी सहभाग घ्यावा. – हनुमंत हेडे, उपसंचालक, कोकण पर्यटन विभाग