| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उत्तरप्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये आलेल्या पराभवाने हादरुन गेलेल्या काँग्रेसमध्ये आता नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली असून, रविवारी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्यावर जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.मुकुल वासनिक यांच्याकडे अध्यक्षपद देण्यासह गांधी समर्थकांनी तीव्र विरोध दर्शविला. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेतला. तसेच पक्षाच्या हितासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड नियोजित वेळेपूर्वीच घेण्याबाबत चर्चाही झाली.
बैठकीत पक्षाच्या गटाच्या नेत्यांनी मुकुल वासनिक यांना काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदासाठी पुढील काँग्रेस अध्यक्ष म्हणून सुचवले. मात्र, ही सूचना काँग्रेसच्या कार्यकारिणीने मान्य करण्यास नकार दिला, असे सूत्रांनी सांगितल्याचे एएनआयने म्हटले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधींसह प्रियांका गांधीही या बैठकीत उपस्थित होते. गुलाम नबी आझाद यांच्या घरी या नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घेणे आणि अन्य संघटनात्मक सुधारणा करण्याच्या उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. ही गटबाजी पाहता काँग्रेस हायकमांडने पराभवाचा आढावा घेण्यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या मुद्द्यांचा उल्लेख केला. पण पक्ष नेतृत्वात फेरबदलाची गरज नाही. कारण राहुल आणि प्रियंका गांधी मनापासून प्रयत्नफ करत आहेत, असे ते म्हणाले. भविष्यातील निवडणुकांमध्ये अपेक्षित निकालांसाठी पुनर्रचना करण्याचे आवाहन करत पक्षाचे आणखी एक नेते आणि प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या वर्षाच्या शेवटी होणार्या संघटनात्मक निवडणुकांवर भर दिला. मात्र, पक्ष नेतृत्वात कोणत्याही बदलाची गरज असल्याचेही त्यांनी नाकारले.