| पेण | वार्ताहार |
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत नगरपालिका स्वच्छता विभागामार्फत पेण शहरात स्वच्छता यात्रेचे आयोजन केले होते. पेण नगरपालिका कार्यालयापासून आंबेडकर चौक, शिवाजी चौक, आंबिका मंदिर, कुंभार आळी, नंदिमाळ नाकामार्गे विश्वेश्वर पर्यंत काढण्यात आली. या स्वच्छता यात्रेमध्ये मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य विभागाच्या अंकिता इसाल, शिवाजी चव्हाण, उमंग कदम, अॅड. तेजस्विनी नेने, नगरसेवक संतोष पाटील, प्रदिप पाटील, प्रमोद फाटक, शशी भगत यांच्यासह स्वच्छता विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
पेण शहराचे कारभार जेव्हा पासून जीवन पाटली यांच्या हातात आला आहे. तेव्हा पासून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले असून वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून पेण शहरातील जनतेला त्या उपक्रमांमध्ये शामिल करून घेतले आहे. हया स्वच्छता यात्रेची रॅली संपल्यानंतर अंकिता इसाल यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे नगरपालिकेने आज केलेला वृक्षारोपण हा उल्लेखनिय असून यामध्ये सर्व फळ झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, पेरू, फणस, चिकू, रांजन इत्यादींचा समावेश होता.
लोकप्रतिनिधींनी गैरहजर
पेण नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता यात्रेचे शहरामध्ये आयोजन केले होते या स्वच्छता यात्रा रॅलीसाठी सर्व आजी-माजी नगरसेवकांना आमंत्रित केले होते. जे लोकप्रतिनिधी कामांच्या उद्घाटनाला अथवा लोकार्पण सोहळयालासाठी गर्दी करतात परंतु शहराच्या स्वच्छतेसाठी पाठ फिरवतात. या स्वच्छता रॅलीसाठी फक्त तेजस्विनी नेने आणि संतोष पाटील हेच सहभागी झाले होते याचाच अर्थ असा की, लोकप्रतिनिधींना शहराच्या स्वच्छतेशी काही पडलेले नाही.