बंदी असतानाही खाद्यपदार्थांची वर्तमानपत्रात पॅकिंग

शाईतील हानिकारक घटक तपासण्यासाठी प्रयोगशाळा निर्माण करा, ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची मागणी

| वावोशी | वार्ताहर |

अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यावर बंदी घातली असतानाही आजही वर्तमानपत्राचा वापर पॅकिंगसाठी केला जात आहे. वर्तमानपत्र मुद्रणातील शाईमध्ये हानिकारक घटक असल्यामुळे ही बंदी घातली असली तरी शाईतील रासायनिक घटक तपासण्यासाठी भारतात कुठलीच यंत्रणा नसून, त्यासाठी शाई तपासणीसाठी सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा स्थापन कराव्या, अशी मागणी ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केली आहे. मुंबईत नुकताच ‘एशिया कोट ईंक प्रदर्शन 2022’ पार पडले. त्यानिमित्ताने वर्तमानपत्राचा वापर खाद्यान्न पॅकिंगसाठी करू नये, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

सविस्तर माहितीनुसार, वृत्तपत्र छापताना ज्या प्रकारच्या शाईचा उपयोग केला जातो, त्यात सोल्यूंट हे हानिकारक रसायन असते. हे रसायन इतके हानीकारक असतात की, यामुळे कॅन्सरसारखा आजारही उद्भवू शकतात.

वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते. आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते. FSSAI ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने देखील अनेकदा मुद्रित पेपरवर ठेवलेले अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगितलं आहे. पेपरवर असलेली शाई, अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात जाते म्हणजे एकप्रकारे केमिकलच आपल्या पोटात जातं. यामुळे पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते. या केमिकलचा हार्मोन्सवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नुकताच खाद्यांनासाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. याच पार्श्‍वभूमीवर भारतातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शाईतील हानिकारक रासायनिक घटक तपासण्यासाठी भारतात चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात याव्या, अशी ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केली आहे.

तसेच भारतातील शाई उद्योगातून जवळपास 10 लाख रोजगार निर्माण झालेले आहे. तर मोठ्या प्रमाणात महसूल सरकारला मिळतो तरीही केंद्र सरकार विदेशातून येणार्‍या शाईला प्राध्यान्य देत आहे. शाई उद्योगासाठी योग्य सरकारी धोरण नसल्यामुळे भारतीय शाई उद्योग अडचणीत येऊ शकतो ,अशी भीती ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने व्यक्त केली केली आहे.

देशातील संपूर्ण मुद्रण उद्योग जवळपास 15 कोटी लोकांना रोजगार देतो, तसेच वर्तमानपत्र, मासिके, खाद्य पॅकेजिंग आणि सर्व प्रकारच्या पॅकेजिंगच्या छपाईसह मुद्रण शाईच्या गुणवत्तेची आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतता तपासण्याची सुविधा उपलब्ध असल्यास भारत हे मुद्रण शाई उत्पादनाचे जगातील प्रमुख केंद्र बनू शकते.

राघवन श्रीधरा
अध्यक्ष, ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

जगभरातील मुद्रण शाई उत्पादक हे कच्चा माल आणि शाईच्या पुरवठ्यासाठी भारताकडे डोळे लावून बसले आहेत. कारण युरोपातील भू-राजकीय तणाव आणि डगमगलेल्या आर्थिक परिस्थितीत चीनला एक प्रभावी आणि विश्‍वासार्ह अशा पर्यायाचा शोध घेणे हे संपूर्ण जगासाठी क्रमप्राप्त ठरले आहे.

रवींद्र गांधी, सचिव,
आशिया कोट इंक शो 2022
Exit mobile version