| रायगड | खास प्रतिनिधी |
शिवजयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी (दि.19) अलिबाग शहरात ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे देशाला संबोधित करणार आहेत, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासीउपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांसह पोलीस विभाग, पनवेल महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बुधावारी सकाळी 8 वाजता शिवचरित्रावर व्याख्यान हाेणार असून सकाळी साडेआठ वाजता पदयात्रेचा शुभारंभ पोलीस कवायत मैदान येथून होणार आहे. तर, छ. शिवाजी महाराज चौक येथे समारोप होणार आहे. यादरम्यान विविध चौकात मल्लखांब, दांडपट्टा, कुस्ती, आदिवासी नृत्य, योग, लेझिम पथक, पारंपारिक पोषाखातील मुले, स्वच्छता अभियान, समुहगानाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, पदयात्रेदरम्यान संबंधितांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात व पोलीस विभागाने देखील वाहतूक व्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले आहेत.