। सुधागड-पाली । वार्ताहर ।
वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली पूल 1950 आली बांधण्यात आला आहे. या पुलावर वाहनांची कायमच ये-जा असते. मात्र, 72 वर्षांपूर्वी वाहन संख्येच्या तुलनेत आत्ताच्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एखादे अवजड वाहन या पुलावरून जात असले की पुलाला हादरा बसतो आहे. सातत्याने पुलावरुन होत असलेली ओव्हरलोड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाला असून, धोका वाढला आहे.
वाकण-पाली मार्गावर अवजड व ओव्हरलोड वाहतुकीस बंदी असताना कोळसा, खडी, ग्रिट, लोखंडी क्वाईल, लोखंडी पाइप यांची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, वाकण येथे वाहतूक पोलीस चौकी असताना व वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतानादेखील या मार्गावर अवजड व ओव्हरलोड वाहतूक सर्रास पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात महाड येथील सावित्री नदी व काशिदसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.