| पाली | प्रतिनिधी |
इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा फटका आता अष्टविनायक तीर्थक्षेत्रालाही बसू लागला आहे. पालीतील बल्लाळेश्वर गणपती मंदिर येथे भाविकांसाठी चालणारे अन्नछत्र मागील दहा दिवसांपासून बंद आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने देवस्थान समितीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
दररोज देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांपैकी सुमारे 400 हून अधिक भाविक अन्नछत्राचा लाभ घेत होते. एप्रिल-मे महिन्यात ही संख्या आणखी वाढत असते. मात्र, अन्नछत्र बंद झाल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. याचबरोबर प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडूही उपलब्ध नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परिसरातील हॉटेल व्यवसायही गॅसअभावी विस्कळीत झाल्याने जेवणाची व्यवस्था करणे कठीण झाले आहे.
भाविकांना केवळ 30 रुपयांत मुबलक भोजन देणारी ही सेवा पूर्णतः सेवाभावी स्वरूपाची आहे. मात्र, व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याने अन्नछत्र थांबवावे लागले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून गॅस पुरवठा सुरळीत केल्यास अन्नछत्र व प्रसाद सेवा तात्काळ सुरू करू.
– जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान, पाली







