वेळेत विक्री न झाल्याने नाशवंत भाज्यांची नासाडी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. पाली हे तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण आहे. आजुबाजूच्या परिसरातील लोकांना पालीत रोजगार व व्यवसायाच्या संधी अधिक आहेत. त्यामुळेच शेजारील गावातील शेतकरी व प्रामुख्याने आदिवासी आपल्या शेतात व परसबागेत पिकविलेला भाजीपाला, फळे व फुले घेवून पालीत विकण्यासाठी नित्यनियमाने येतात. मात्र या हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांना पालीत व्यवसाय करण्यासाठी बसण्याची हक्काची जागा नाही. रस्याच्या कडेला जागा मिळेल तिथे हे विक्रेते आपला माल विकण्यासाठी बसतात. परिणामी त्यांची मोठी गैरसोय होते. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
पालीत प्रामुख्याने बाजारपेठ, मिनिडोअर स्टँन्ड रस्ता ते पाली बस स्थानक, गांधी चौक, जुने एसटी स्टँड, मारुती मंदिर नाका व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला विक्रिसाठी बसतात. रस्त्याच्या कडेला त्यांना पुरेशी जागा देखिल नसते. मात्र नाईलाजाने त्यांना तिथे बसावे लागते. सुधागड तालुक्यात मच्छीमार्केट व मटण मार्केट आहे, त्याप्रमाणे भाजी मार्केट देखील असावे अशी मागणी मागील अनेक वर्षे आदिवासी बांधव करीत आहेत. मात्र या मागणीकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात व इतर मोसमात रानभाज्या, कंदमुळे मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने आदिवासी बांधव जागा मिळेल तिथे बसतात. परिणामी जागेअभावी व्यवसायाला फटका बसतो, भाजी नाशवंत असल्याने वेळेत विक्री होत नाही व या भाजी विक्रेत्यांना मोठे नुकसान सोसावे लागते.
सध्या उन्हाळा सुरु असल्याने या उन्हाचा खुप त्रास या विक्रेत्यांना होतो. पिण्याचे पाणी आणि खाण्यापिण्याची देखिल अबाळ असते. दैनंदिन विधी आटोपण्यासाठी देखिल त्यांची खुप परवड होते. कारण पालीत सार्वजनिक मुतार्या आणि स्वच्छतागृह नाहित. अनेक ग्राहक किंमत पाडून माल विकत घेतात. बहुतांश माल हा नाशवंत असल्याने संध्याकाळी परततांना कवडीमोल भावात द्यावा लागतो. परिणामी या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे या विक्रेत्यांना शासनाकडुन हक्काची जागा देणे. जेणेकरुन नियमित हे विक्रेते त्या ठिकाणी बसुन आपला माल विकतील. त्याच बरोबर या विक्रेत्यांची देखिल वणवण आणि परवड थांबेल.
मोक्याची जागा हवी
पालीतील भाजी मार्केटची जागा फारशी मोठी नाही. तिथे काही थोडेच विक्रेते बसतात. रस्त्यावर विक्री करणार्या फळभाजीपाला विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध करुन द्यायची असेल तर त्यासाठी मोकळी व मोक्याची जागा अवाश्यक आहे. शासकिय किंवा गावठाण जागेचा वापर यासाठी होऊ शकतो. मात्र त्यासाठी शासकिय व ग्रामपंचायतीची इच्छाशक्ती आणि त्याबरोबरच पुरेसा निधी आवश्यक आहे.