| पनवेल | प्रतिनिधी |
लाखो प्रवाशांना दिलासा देणारा पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉर आता प्रत्यक्षात येणार आहे. मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत विकसित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 69.23 किमी लांबीच्या या पनवेल-बोरिवली-वसई उपनगरीय लोकल रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी एकूण 12,710 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
पनवेलपासून सुरू होणारा हा प्रकल्प वसईमार्गे बोरिवली आणि विरारपर्यंत पोहोचणार आहे. या मार्गावर एकूण 19 स्थानके बांधली जाणार आहेत. ज्यामध्ये भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, तळोजा पांचंद, कळंबोली आणि बोरिवली अशी स्थानके असणार आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत नवी मुंबई (पनवेल) ते बोरिवली किंवा वसई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुर्ला किंवा वडाळा येथे लोकल ट्रेन बदलाव्या लागत होत्या. नवीन कॉरिडॉरमुळे ही समस्या दूर होईल आणि थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे दररोज पश्चिम मुंबईला कामासाठी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल. पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठीही हा मार्ग खूप फायदेशीर ठरेल, कारण आता ते पनवेलहून थेट गोवा किंवा पुणे येथे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे पकडू शकणार आहेत.
पलावा सिटीला मोठा फायदा
लोकल ट्रेनच्या या नवीन कॉरिडॉरमुळे, लूम पॉवर उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या भिवंडी शहराला आता नवी मुंबई आणि पश्चिम मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे भिवंडीच्या विकासाला एक नवीन दिशा मिळेल. शिळफाटा रोडवर असलेल्या पलावा, रुणवाल सिटी सारख्या मोठ्या निवासी प्रकल्पांमधील रहिवाशांनाही या रेल्वे मार्गाचा दिलासा मिळेल. त्यांना एका बाजूला बोरिवली आणि वसईला थेट प्रवेश मिळेल तर दुसऱ्या बाजूला पनवेलला सहज प्रवेश मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत मोठा बदल दिसून येईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या कॉरिडॉरच्या सुरुवातीमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. यामुळे सध्याची गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास पूर्वीपेक्षा जलद आणि आरामदायी होईल.






