सांडपाण्यावर प्रक्रिया करून उद्यानांना नवजीवन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका हद्दीतील पाच हजार स्क्वेअर फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या उद्यानांमध्ये पालिकेच्या माध्यमातून एचटीपी प्लांट बसवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, मर्यादित पाणी उपलब्धता आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यातून शाश्वत जलव्यवस्थापनाचा आदर्श निर्माण होत आहे.
या अंतर्गत नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर तसेच इतर वसाहतींमधील एकूण 42 उद्यानांमध्ये एचटीपी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी शेजारील रहिवासी वसाहतींमधून शिवरेज लाईनद्वारे बाहेर पडणारे सांडपाणी गोळा करून त्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेनंतर शुद्ध केलेले पाणी उद्यानांच्या सिंचनासाठी वापरण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक उद्यानामध्ये 20 हजार लिटर क्षमतेच्या पाणीसाठवण टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्यानांना दररोज सुमारे 20 हजार लीटर पाणी उपलब्ध होत असून, पाणीटंचाईच्या काळातही हिरवळ टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर कमी होऊन त्याची बचत होणार आहे. तसेच, सांडपाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनाला चालना मिळत असून, शहरातील जलसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत उद्यानांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो, मात्र या प्रकल्पामुळे ती समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शहरातील उद्याने अधिक हिरवीगार, स्वच्छ आणि आकर्षक राहण्यास मदत होणार असून, नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिक नागरिकांकडून या प्रकल्पाचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यात आणखी उद्यानांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
42 उद्यानांना दररोज 20 हजार लीटर पाण्याचा पुरवठा
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर तसेच इतर वसाहतींमधील एकूण 42 उद्यानांमध्ये एचटीपी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या अंतर्गत शेजारील वसाहतींमधून शिवरेज लाईनद्वारे येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्यानांच्या सिंचनासाठी वापरण्यात येत आहे.
प्रत्येक उद्यानामध्ये 20 हजार लीटर क्षमतेच्या पाणीसाठवण टाक्या बसविण्यात आल्या असून, त्यामुळे दररोज 20 हजार लीटर पाणी उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यातही उद्याने हिरवीगार व ताजीतवानी राहण्यास मदत होणार असून, पाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळत आहे.
