होल्डिंग पॉन्डच्या सफाईसाठी पनवेल महापालिका न्यायालयात

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली वसाहती मधील गाळाने भरलेल्या धारण तलावांमुळे वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. या मुळे गाळ काढण्यास परवानगी मिळावी या करीत पनवेल पालिकेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. समुद्र सपाटीपासून खाली असलेल्या कळंबोली वसाहतीत सिडको तर्फे होल्डिंग पॉन्ड ची निर्मिती करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यापासून वसाहतींचे संरक्षण व्हावे या हेतूने सिडकोने बांधलेले हे धारण तलाव सध्या गाळाने व खारफुटीने भरलेले आहेत. गाळ आणि खारफुटीने भरल्यामुळे या ठिकाणी नेहमीच उग्र वास येत असतो. धारण तलावात 80 टक्के गाळ असल्याने केवळ 20 टक्केच पाणी साचू शकते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही.

त्यामुळे दरवर्षी पावसाळयात कळंबोली शहरात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या धारण तलावांची स्वच्छता व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी देखील या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मात्र धारण तलावात वाढलेल्या कांदळवाणामुळे गाळ काढतांना कांदळवनांना धोका पोहचण्याची शक्यता असल्याने धारण तलावाची स्वच्छता करण्यासाठी कांदळवन कक्षाच्या मान्यतेची गरज लागत आहे.

कळंबोलीच का ?
पालिका हद्दीत असलेल्या सर्वच सिडको वसाहती मध्ये धारण तलाव आहेत. खारघर वसाहती मधील धारण तलावाचे पालिकेकडे हसतांतरण झाले आहे. तर कळंबोली व इतर वसाहती मधील धारण तलावाचे हस्तातरण होणे बाकी आहे. मात्र समुद्र सपाटी पासून खाली असल्याने कळंबोली वसाहतीला पुराचा धोका जास्त असून,2005 साली आलेल्या पुरा वेळी देखील कळंबोली वसाहत जास्त वेळ पाण्याखाली गेली होती. या मुळे हस्तातरण बाकी असताना देखील कळंबोली वसाहती मधील धारण तलाव स्वच्छ करण्यास पालिका प्रशासन प्राथमिकता देत आहे.

मलनिस्सारण वाहिन्या आणि पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई कामांची जबाबदारी पालिकेने स्वीकारली आहे, कळंबोलीसाठी उभारण्यात आलेला होल्डिंग पाँड गाळाने भरल्याने वर्षभर पाण्याने भरलेला राहत असून, येथील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत आहेत. पावसाळ्यात भरतीच्या वेळी खाडीचे पाणी होल्डिंग पाँडमध्ये शिरून शिवरेज लाईन द्वारे वसाहतीत पूर येण्याची शक्यता जास्त आहे.

सिडकोतर्फे यापूर्वी धारण तलावाच्या स्वच्छतेसाठी परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र यात सिडकोला अपयश आले. कळंबोली येथील धारण तालावचे पनवेल पालिकेकडे हसतांतरण झालेले नाही मात्र वसाहतीला असलेला पुराचा धोका लक्षात घेत कळंबोली वसाहती मधील धारण तलावाच्या स्वच्छतेची परवानगी मिळावी या साठी पनवेल पालिके मार्फत सरुवात करण्यात आली असून, या करिता पालिके तर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

– संजय कटेकर, पालिका बांधकाम अधिकारी


धारण तलाव म्हणजे काय
मुसळधार पावसात भरतीच्या वेळेत पावसाचे पाणी शहरात साचू नये, यासाठी सिडकोने शहराची निर्मिती करताना खाडीकिनारी जागोजागी मोठे धारण तलाव उभारले. या तलावांची उभारणी करताना हॉलंड शहराचे नियोजन लक्षात घेण्यात आले. धारण तलावांना लागूनच मोठे फ्लॅप गेट बसविण्यात आले. त्यामुळे भरतीच्या वेळेत हे गेट आपोआप बंद होऊन खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. याशिवाय शहरातील पावसाचे पाणी धारण तलावांमध्ये साठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Exit mobile version