आठवण्यातून एकदा पाणीकपात, पालिकेच्या निर्णयाने नागरिक हवालदिल
। पनवेल । वार्ताहर ।
पाणी कपातीबाबत पनवेल महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पनवेल महापालिका क्षेत्रात एक दिवस पाणीकपात केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी पाणी कपात करण्यात आल्याचे बोललं जातंय. उन्हाळ्यापर्यंत पनवेलकरांना उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी दिल्यास पाण्याची कमतरता भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून वेळीच सावधगिरी बाळगण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करुन पाणीटंचाई थोपवली जात असल्याचंही बोलले जात आहे. गेल्या दोन वर्षांत पाण्याबाबत पनवेलकरांमध्ये पाण्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार आलेली नसल्याने हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पालिकेने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याववरुनही चर्चांना उधाण आले आहे.
पनवेल शहरात दिवसाला 30 ते 32 एमएमलडी पाणी लागते. देहरंग धरणातून दिवसाला सात ते आठ एमएलडी पाणी घेण्यात येते. एमजेपीकडून 9 ते 10 एमएलडी पाणी मिळते. तर एमआयडीसीकडून मिळणार्या 5-6 एमएलडी पाणी उपलब्ध होते. यातून सध्या देहरंग धरणातील पाणी शहराला पावसाळ्यापर्यंत पुरावे यासाठी पाणी कपातीचे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
खरंतर यंदा अतिवृष्टीमुळे पाण्याची समस्या उद्भवणार नाही, अशी अपेक्षा पनवेलकरांना होती. मात्र पाणी कपातीच्या निर्णयाने पनवेलकरांचा अपेक्षाभंग झाला असून आता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पनवेलकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे लोकांनाही आता पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जातंय.
बुधवार, शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व भागात सुरळीत पाणी पुरवठा असेल. मात्र इतर दिवशी पाणी कपात करण्यात येणार आहे. तसंच शहरातील उंच जलकुंभनिहाय भागातही आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विभागनिहाय आठव्यातून एक दिवस पामीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. -रामदाय तायडे,पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी
धरणाची पाणी क्षमता खालावली
पनवेल शहराला देहरंग धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र या धरणाची पाणी साठवण क्षमता खालावली असल्याचे बोलले जाते धरणातील गाळ अनेक वर्षांपासून काढला नसल्याने या धरणातील पाणी धारण क्षमता कमी झाली असून याचा परिणाम पालिकेतर्फे केल्या जाणार्या पाणीपुरवठ्यावर होतोय. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते.