| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवारी (दि.2) सकाळी दहा वाजता, नवीन पनवेल येथे पक्ष सदस्यांचा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे. शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी बैठकित दिली.
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अलिबागमधील शेतकरी भवन येथे अलिबाग व मुरूड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक सोमवारी (दि.28) आयोजित करण्यात आली. यावेळी शेकाप राज्य सोशल मिडीया प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमूख ॲड. मानसी म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, शेकाप जिल्हा महिला आघाडीच्या वृषाली ठोसर, ॲड. निलम हजारे, ॲड. किशोर हजारे, अनिल चोपडा, शेकाप कार्यालयीन चिटणीस अजय झुंजारराव, अशोक प्रधान, रिजवान आदींसह मुरूड व अलिबाग तालुक्यातील जिल्हा, तालुका चिटणीस मंडळ, आघाडीचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्याची तयारी झाली आहे. गावोगावी, शहरी भागात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकापचा वर्धापन दिन तथा मेळावा हा कार्यकर्त्यांना उमेद देणारा आहे. त्यामुळे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्यादेखील प्रचंड असणार आहे. या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य खजिनदार अतूल म्हात्रे, शेकाप प्रवक्त्या तथा सोशल मिडीया प्रमूख चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप सहचिटणीस ॲड. गौतम पाटील आदी दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. महिला, तरुण, युवक, ज्येष्ठ अशा सर्वच कार्यकर्त्यांना हा मेळावा एक वेगळी शक्ती, उमेद देणारा असणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. या मेळाव्यातून मिळालेली विचारांची शिदोरी घेऊन कार्यकर्ता एक वेगळ्या उमेदीने निवडणूकांसाठी कामाला लागणार आहे. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे.
बैठकीत शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे सर्व कार्यकर्त्यांसाठी दसरा दिवाळी व वाढदिवस म्हणून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या. कर्जतपासून, म्हसळा, पोलादपूर पासून पनवेलपर्यंत झालेल्या या बैठकीला कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकांची सांगता अलिबागमध्ये होत आहे. या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी रोजगार मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यातून हजारो तरुणांना रोजगाराचे दालन खुले करून देण्यात आले आहे. शिक्षण, पर्यावरण आणि रोजगार या तीन भुमिका महत्वाच्या आहेत. त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. शेकापने कायम स्थानिकांना रोजगार मिळावा, म्हणून लढा दिला आहे. कंपनी, कारखान्यांना तसेच विकासाला शेकापचा कधीच विरोध राहिला नाही. मात्र, शेकापच्या भुमिकेबाबत चुकीचे मेसेज पोहचविण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. शेकापच्या माध्यमातून अनेक मंदिरे बांधण्यात आली आहे. वेगवेगळ्या संस्था उभ्या करून रोजगार निर्माण करून दिला आहे. कोरोना काळातही शेकापने घरोघरी जाऊन काम केले आहे. कोरोना सेंटरसह व्हॅक्सीन व इतर सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी रात्रीचा दिवस करून काम केले आहे. निधी मंजूर केल्याचे विरोधक सांगत आहेत. मात्र, हा निधी फक्त कागदावर आहे. टक्केवारीची दुकाने त्यांनी चालू ठेवली आहेत. त्यावर त्यांचा कारभार चालत असल्याचे ॲड. गौतम पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रभावी प्रश्न मांडणारी व्यक्ती भाईंच्या रुपाने विधी मंडळात असणे गरजेचे आहे, असे ॲड. गौतम पाटील म्हणाले.
हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी मेळाव्यात सहभागी व्हा : ॲड. गौतम पाटील
प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी ठाम उभा आहे. वेगवेगळ्या बैठकांतून कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला आहे. शेकापच्या वर्धापन दिना निमित्त होणाऱ्या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतील असा विश्वास आहे. एक ऐतिहासिक असा हा मेळावा ठरणार आहे. त्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हा असे शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी आवाहन केले आहे.





