बस वेळेत येत नसल्याने प्रवासास विलंब
| उरण | वार्ताहर |
मोरा ते मुंबई व जेएनपेटी बंदर ते मुंबई या दोन्ही जलमार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून मुंबईत आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्टची बस किंवा टॅक्सी वेळेत उपलब्ध होत नसल्याने विना कोंडी व जलद प्रवास करूनही इच्छित स्थळी जाण्यास उशीर होत आहे. याचा फटका उरणमधील मुंबईत उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थी चाकरमानी, व्यावसायिक यांना बसत असल्याने उरणमधील जलप्रवाशांच्या सोयीसाठी बस आणि टॅक्सी सेवा नियमित करण्याची मागणी या मार्गावरील प्रवाशांकडून होत आहे.
उरणच्या मोरा बंदरातून ब्रिटिश काळापासून उरण ते मुंबई ही बारमाही जलसेवा सुरू आहे. तर मागील 32 वर्षांपासून जेएनपीटी बंदरातून ही जेएनपीटी ते मुंबई अशी जलसेवा सुरू करण्यात आली आहे. यातील मोरा ते मुंबई ही भाऊचा धक्का अशी सेवा आहे. तर जेएनपीटी ते मुंबई भाऊचा धक्का ही पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर अशी चार महिने व ऑक्टोबर ते मे या महिन्यात जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया अशी प्रवासी सेवा सुरू असते. या दोन्ही सेवा बारमाही सुरू असतात. त्यामुळे उरण व येथील औद्योगिक परिसरात प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. त्याचप्रमाणे अलिबाग ते मुंबई असा रेवस व मांडवा या दोन्ही बंदरातील प्रवासीही भाऊचा धक्का येथूनच प्रवास करतात. या दोन्ही मार्गाने तासाभरात मुंबईला पोहोचता येते, त्यामुळे उरणमधील प्रवासी प्राधान्याने या मार्गाने प्रवास करतात, तर उरणमधील व्यावसायिक व्यापारी व दक्षिण मुंबईत शिक्षण घेणारे विद्यार्थीही याच मार्गाने मुंबईत प्रवास करतात.
परंतु, भाऊच्या धक्क्यावरून मुंबईत आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्टची बस किंवा टॅक्सी वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे जलप्रवाशांच्या सोयीसाठी बस आणि टॅक्सी सेवा नियमित करण्याची मागणी या मार्गावरील प्रवाशांकडून होत आहे.