अखंड वीजपुरवठ्यासाठी नियमित वीजबिले भरा- विजय सिंघ

| मुंबई | प्रतिनिधी |

महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे 80 टक्के रक्कम वीज खरेदीवर होत असल्याने अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय असून घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषीग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

ते म्हणाले की, महावितरणसुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण वीजनिर्मिती करत नाही किंवा कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 80 टक्के रक्कम ही वीजखरेदीवर खर्च होते. 2021-22 या गेल्या आर्थिक वर्षात महावितरणने वीजखरेदीपोटी 69,478 कोटी रुपये खर्च केले होते, असे ते म्हणाले.

बिलांची थकबाकी वाढली
महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीजखरेदीचे पैसे देते व त्याचबरोबर कर्मचार्‍यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागवला जातो. वीजबिलांतून उत्पन्न मिळणे म्हणजे महावितरणचा श्‍वास चालू राहण्यासारखे आहे. अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणकडे ग्राहकांनी वीजबिले भरणे हा एकमेव पर्याय आहे. वीज ग्राहकांची बिलांची थकबाकी 73,361 कोटींवर गेल्याने ग्राहकांनी वीजबिले भरणे अधिक गरजेचे झाले आहे.

महावितरणकडून शेतकर्‍यांना खूप मोठ्या सवलतीच्या दरात वीजपुरवठा होतो. तरीही राज्यातील 15 लाख 19 हजार कृषीग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे 21,067 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी 3 लाख 23 हजार असे कृषीपंपधारक ग्राहक आहेत ज्यांनी गेली पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे 5,216 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

विजय सिंघल, महावितरण अध्यक्ष

विजेमुळे शेतीचे सिंचन होते, शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढते, त्यातून त्यांना चांगले जीवन जगता येते, तरीही त्यांच्या एकूण खर्चाच्या तुलनेत कमी असलेले वीजबिल भरण्यास काही शेतकर्‍यांची अनास्था दिसते. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. पाणी पुरवठा, काम, इमारतीतील लिफ्ट, वाहतूक नियंत्रण, कार्यालयांचे कामकाज, बँकिंग अशा अनेक सेवा या वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी अखंड वीजपुरवठा करायचा तर महावितरणला वीज खरेदी करण्यासाठी पैसे उभे करणे आवश्यक आहे. महावितरणकडे बिलांच्या माध्यमातून पैसे आले तरच कंपनीला वीज खरेदी करणे आणि ती ग्राहकांना पुरविणे शक्य आहे, याची नोंद घ्यावी आणि वीजबिले भरण्यास प्राधान्य द्यावे आणि वेळेत वीजबिले भरावीत, असेही आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, महावितरण ग्राहकांना केवळ वापरलेल्या विजेचे पैसे बिलाच्या स्वरुपात आकारते. जी सेवा वापरली आहे त्याचे बिल देण्यास कोणी विरोध करेल अशी शक्यता नाही. काही ग्राहक मोबाईल बिल, डीटीएचचे बिल, केबलचे बिल अशी बिले नियमित भरतात त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेल्या विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात हे आश्‍चर्यकारक आहे.

Exit mobile version