शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकापचे आंदोलन

केंद्र तथा राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी
विविध मागण्यांचे निवेदन : मागण्या पूर्ण झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

। बीड । विशेष प्रतिनिधी ।

येथील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र तथा राज्य सरकारच्या विरोधात शेकापच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
2021 वर्षात बळीराजा निसर्गाचा अवकृपेने हवालदील झाला आहे. त्यातच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कृषी धोरणांमध्ये शेतकर्‍यांना नवे बळ, नवी उभारी, सुरक्षितता प्रदान करेल याबाबत निश्‍चित स्वरूपाची स्पष्टता आढळत नाही. यामुळेच या आंदोलनप्रसंगी, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दिवसेनदिवस शेतकर्‍यांच्या विरोधी भूमिका घेऊन शेतकर्‍यांना एक प्रकारे आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्याचे काम करत असल्याचा आरोप, कार्यकर्त्यांनी केला आहे.


या आंदोलनात शेतकर्‍यांच्या वतीने शेकापने विविध मागण्यांचे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजारांची तात्काळ मदत, एफआरपीचे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी 14 दिवसाच्या एकरक्कमी द्यावी, 2020 मधील पीक विमा तात्काळ शेतकर्‍याच्या खात्यावर जमा करावा, जिल्ह्यातील पाझर तलाव नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे पीक कर्ज व शेतीपंपाचे दोन वर्षांचे विज बील माफ करण्यात यावे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र स्वरूपातील आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी अ‍ॅड. नारायण गोले पाटील, अ‍ॅड.संग्राम तुपे, भाई दत्ता प्रभाळे, भाई अर्जुन सोनवणे, भाई भीमराव कुटे, नवनाथ जाधव, अमोल सावंत, प्रशांत चाटे, मुंजाबा पंचाळ, बलभीम भगत, विलास मुंडे, बालू इतापे, तथा शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version