पर्यटन व्यवसायावरही परिणाम
| श्रीवर्धन | आनंद जोशी |
श्रीवर्धनमध्ये होणार्या सततच्या वाहकूत कोंडीने नागरिक त्रस्त झालेले आहे.याचा परिणाम येथील व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात होत असल्याने यावर कायमस्वरुपी योजना करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
श्रीवर्धनमध्ये गेल्या काही वर्षापासून सुशोभिकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने पर्यटकांचा ओघ दिवंसेदिवस वाढत चालला आहेत.विकेंडबरोबर अन्य वारीही पर्यटकांची वाहने शहरात येत असतात. परंतु गावांतील आणि बाहेरुन येणार्या वाहनांच्या संख्येचा विचार करता गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की अनेक वेळा शहराच्या सुरुवातीला असलेल्या श्रीवर्धन नगर परिषदेपासून वाणी आळी, छ.शिवाजी चौक, महावीर मार्ग,श्री सोमजादेवी मंदिर मार्ग, गंद्रे नाका इ.रस्त्यांवर वारंवार इतकी वाहतूक कोंडी होते की पर्यटक आणि स्थानिक यांचेमध्ये वादाचे प्रसंगही येतात.श्रीवर्धन शहराचे टाऊन प्लॅनिंग केव्हाच मंजूर झालेले असून रस्ते किती रुंद होणार आहेत त्याचे मार्कींगही जागोजागी झालेले आहे.परंतु रस्ते रुंदीकरण केव्हा होईल हे कोणालाच माहिती नाही.
हे सर्व टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण काही ठोस उपाययोजना तातडीने होणे अत्यावश्यक आहे.श्रीवर्धन गावांत प्रवेश करतांना प्रारंभीच श्रीमंत पेशवे प्रवेशद्वार आहे .तेथे रायगड जिल्हा पासिंगची वाहने,राज्य-केंद्र शासनाची वाहने व अन्य काही वाहने वगळून अन्य वाहनधारकांकडून श्रीवर्धन नगर परिषदेतर्फे विशिष्ट दराने पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी म्हणून काही रक्कम वसूल केली जाते व त्याची पावती दिली जाते.ही फी वसुली करण्यासाठी या कामाचा ठेका दिला जातो.तेथेच बाहेरुन येणार्या पर्यटकांना शहरातील रस्त्यांची कल्पना देण्यात येऊन वाहतूक कोंडी टाळता आली तर प्रयत्न व्हावा अशी सूचना काही पर्यटक करतांना आढळतात.
दुसरा उपाय म्हणजे शहरातील छ.शिवाजी चौकात व बाजार पेठेत कायम स्वरुपी वाहतूक पोलीस तैनात करणे.परंतु पोलीस संख्या कमी असल्यामुळे अनेक वेळा वरील ठिकाणी वाहतूक पोलीस नसतो असे नागरिकांचे निरीक्षण आहे.तिसरी आणि महत्वाची उपाययोजना म्हणजे गर्दीची ठिकाणे वगळून पर्यटकांसाठी शहराबाहेरुन नवीन रस्ता नगर परिषदेने काढावा. आणि सर्वात महत्वाची आणि कायमस्वरुपी उपाययोजना म्हणजे शहरांतील रस्त्यांचे रुंदीकरण जितक्या लवकर होऊ शकते तितक्या लवकर ते करुन शहरवासियांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीतून सोडवून मोकळा श्वास घेता येईल.वाहतूक कोंडीची दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आणि त्यावरील करता येण्यासारख्या उपाययोजना संबंधित यंत्रणांनी करणेसंबंधी गांभीर्याने विचार व कृती करावी अशी रास्त अपेक्षा नागरिक व पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.