ग्रामपंचायत, तंटामुक्त समितीचा आक्रमक पवित्रा
| गुहागर | प्रतिनिधी |
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मुख्य बाजारपेठेतील पिकपशेड उभारणीला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. तसेच, पथदीप कर महामार्ग प्राधिकरणाने थकविलेला असल्याने बाजारपेठ अंधारात आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या दोनही समस्या मार्गी लावाव्यात, अन्यथा पाटपन्हाळे ग्रामपंचायत, तंटामुक्ती समिती व ग्रामस्थांच्यावतीने स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्यात येईल, असा इशारा शुक्रवारी झालेल्या तंटामुक्त समितीच्या सभेत देण्यात आला.
गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतील पिकपशेड तोडण्यात आली. शृंगारतळी ही तालुक्याची आर्थिक राजधानी असून येथे नेहमीच ग्राहक, प्रवासी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांची गर्दी होते. मात्र, पिकपशेड नव्याने बांधण्यात आलेली नसल्याने प्रवासी व शालेय मुलांना भर उन्हाळ्यात, पावसाळ्यात वाहनांची वाट पाहत उभे रहावे लागते. मोठा गाजावाजा करुन गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाच्या ठेकेदाराने शृंगारतळीत पथदिप बसवले होते. मात्र, त्याने वीजकर थकविल्याने बरेच महिने राजधानी शृंगारतळी अंधारात चाचपडत आहे. याविरोधात पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने तीव्र नाराजी व्यक्त करुन संबंधित ठेकेदाराला व तहसिलदारांना पत्र देऊन वेळोवेळी जाब विचारला. पथदीपांचे मीटर हे मनीषा कन्ट्रक्शनच्या नावे आहे. रुंदीकरण होईपर्यंत देखभाल दुरुस्ती, पथदीप कर भरणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. असे असताना ठेकेदाराने पथदीप कर थकवून पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला अडचणीत आणले आहेच, शिवाय नागरिक, प्रवासी, व्यापारी यांना अंधारात ठेवले आहे. तसेच, महावितरणने वीज खंडित केली आहे व मीटरही काढून नेले आहे. शृंगारतळीत रात्री-अपरात्री वर्दळ असते. सातत्याने चोरी होण्याच्या घटना, रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारी बाजारपेठ त्यामुळे गजबजलेले ठिकाण, असे असताना पथदीप बंद असल्याने मोठी गैरसोय व्यापाऱ्यांसह प्रवासी, वाहनचालक यांची झाली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्यदिनापूर्वी हे दोनही प्रश्न मार्गी न लागल्यास उपोषण करण्याचे सभेत ठरविण्यात आले. आहे.






