धमक्या देत असल्याचा आमदार गोगावलेंवर गंभीर आरोप
। महाड । प्रतिनिधी ।
आमदार गोगावले यांचा ग्रामपंचायत कामामधील हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून जीवितास असणारा धोका याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला वारंवार कळवून देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्राद्वारे इच्छामरणाची मागणी केली आहे. या मागणीवर तातडीने निर्णय झाला नाही तर कुटुंबासह गोगावले यांच्या घरासमोर जून महिन्यात आत्मदहन करण्याचा इशारा कल्पेश पांगारेदिला आहे. या प्रकारामुळे गेले अनेक दिवस भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांची सुरू असलेली मनमानी आणि गुंडगिरीची चर्चा पुराव्यासह समोर आली आहे.
महाड तालुक्यातील पिंपळवाडी या गावचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी ग्रामपंचायतीमधील सुरू असलेल्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवल्यानंतर आमदार गोगावले आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कल्पेश पांगारे यांना धमकी देण्याचे सत्र सुरू केले. यापूर्वी देखील त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार करण्यात आला होता. याबाबत कल्पेश पांगारे यांनी विविध स्तरावर तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारींची दखल आमदारांच्या दबावामुळे घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप केला. याबाबत सविस्तर पाढाच कल्पेश पांगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.
ग्रामपंचायत पिंपळवाडी हे गाव आमदार गोगावले यांचे मूळ गाव आहे. या गावामध्ये त्यांचे घर असले तरी ते गावातील मतदार नाहीत मात्र ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यांचा सतत हस्तक्षेप सुरू आहे. ग्रामपंचायतीमधील बेकायदेशीर कामाच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल 30 एप्रिल 2023 रोजी आमदार गोगावले यांच्या समर्थकांनी संपूर्ण कुटुंबाला गंभीररित्या मारहाण केली होती. गावातील इतर लोकांवर खोटे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. ही बाब इथेच थांबली नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पिंपळवाडी गाव हे आमदार गोगावले यांचे असल्याने आमदार गोगावले यांनाच मतदान करायचे नाही तर वाळीत टाकण्याची आणि त्यांचे हस्तक घरोघर जाऊन जीवे मारण्याची धमकी देतात असा गंभीर आरोप कल्पेश पांगारे यांनी यावेळी केला.
उपसरपंच असलेले कल्पेशपांगारे हे तरुण आणि शिक्षित आहेत. सुरू असलेल्या भ्रष्ट कामाबाबत त्यांना कायमचीड आहे. यामुळे त्यांनी कायम याबाबत आवाज उठवला मात्र त्यांचा आवाज दाबण्यासाठी आमदार गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी सत्र सुरू करण्यात आले. या धमक्यांना कंटाळून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला होता. या प्रवेशाचा राग देखील मनात धरून गावातील लोकांना भडकावण्यात आले आणि उपसरपंच पदाचा राजीनामा मागण्यात आला. जे या ग्रामपंचायतीचे मतदाराच नाहीत त्यांना राजीनामा मागण्याचा काय अधिकार असा सवाल देखील कल्पेश पांगारे यांनी उपस्थित केला आहे. आमदार भरत गोगावले यांच्या गुंडगिरीने मरण्यापेक्षा राष्ट्रपतींनी इच्छा मरण द्यावे अशी मागणी (दि.16) मार्च रोजी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केल्याचेदेखील पांगारे यांनी सांगितले.
प्रशासन दबावाखाली असल्याने ते याबाबत कोणतीच कारवाई करत नाही. यापुढे जर कारवाई झाली नाही तर आपण जून महिन्यात आमदार गोगावले यांच्या घरासमोरच कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारादेखील कल्पेश पांगारेयांनी प्रशासनाला दिला आहे. पिंपळवाडी गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम सुरू असताना शाळेच्या जुन्याच विटा पुन्हा वापरण्यात आल्या होत्या. याबाबत आपण तक्रार केली होती. मात्र, तू तक्रार करणारा कोण असा जाब विचारून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असे पांगारे यांनी सांगून (दि.24) मार्च रोजी पिंपळवाडी गावदेवी मंदिरात ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये भरत गोगावले यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देतउपसरपंच पदाचा राजीनामा दे नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशी धमकी दिली होती. याबाबतचे कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल चित्रफीत, व्हाईस रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा देखील पांगारे यांनी केला आहे.